एक आगळा वेगळास्वातंत्र्य सैनिक नानासाहेब य.ना .चव्हाण ,(श्री.जीजाबरावजी वाघ ,चाळीसगाव ,दैनिक रघुनंदन-स्वतंत्रता दिन विशेषांक यांचे सौजन्यैने)
नानासाहेब य.ना. चव्हाण आपल्या शैक्षणीक कार्याच्या प्रसाराने संपूर्ण महाराष्ट्रात आदरस्थानी आहेत. मात्र नानासाहेब हे प्रसिद्धी , सत्ता व संपत्ती यापासून नेहमीच दूर राहिल्याने त्यांचे सामाजिक क्षेत्रातील प्रचंड असे योगदान जनते समोर आले नाही. सन १ ९ ४२ च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होऊनही नानासाहेबांनी कधीही स्वातंत्र्य सैनिकांना मिळणाऱ्या सुविधांची अपेक्षा बाळगली नाही . त्यांच्या स्वभाव विशेषातील त्याग हा एक पैलू यामुळे चकाकून निघाला आहे . त्यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानावर हा संक्षिप्त दृष्टीक्षेप !
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात १ ९ ४२ या वर्षातील ऑगस्ट महिना हा क्रांतीकारी व एक वेगळ्या आशयाने इतिहासात नोंद झालेला महिना आहे . ह्या चित्तथरारक महिन्याचा इतिहास भारताच्या हजारो पिढयांना जगण्याची नवी उर्मी देणारा ठरला आहे . प्रत्यक्षात ज्यांनी १ ९ ४२ च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होऊन देशसेवेसाठी आपले आयुष्य थोडेफार का होईना वेचले त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या यादीत आगळे वेगळे नाव म्हणून नानासाहेब य.ना. चव्हाण यांचा प्रकर्षाने उल्लेख करावा लागेल.
बालपणापासून निसर्गाशी जवळिक व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची जिद्द बाळगणार्या नानासाहेबांनी रांजणगाव या आपल्या जन्मगावी प्राथमिक शिक्षण पूर्ण करून सण 1938 मध्ये धुळे येथील शेतकी शाळेत प्रवेश घेतला. सन 1938 ते 1940 या या दोन्ही वर्षात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन नानासाहेबांनी धुळ्याच्या गरुड हायस्कूल मध्ये इयत्ता चौथी (इंग्रजी) ची परीक्षा दिली पुढे सहावीत असताना 1942 च्या स्वातंत्र्य संग्रामाचे पडघम देशात निनादत होते बालकापासून तर थेट वृद्धांपर्यंत सर्वच भारतमातेच्या गुलामगिरीच्या साखळ्या तोडू पाहत होते. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत चलेजाव सांगत होता स्वातंत्र्य चळवळीचा हा वणवा धुळ्यातही येऊन पोहोचला. विनोबा भावे ,महात्मा गांधी, साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या नानासाहेबांनी क्षणाचाही विचार न करता स्वातंत्र्य संग्रामाच्या अखेरच्या पर्वात स्वतःला झोकून दिले शाळकरी वयाचे नानासाहेब हे आपल्या भावनाप्रधान स्वभावामुळे धुळे येथील विद्यार्थ्यांमध्ये विशेष प्रिय होते बरेचसे विद्यार्थी व त्यांचे मित्र नानासाहेबांना 'दे.भ.बापुजी' या टोपण नावाने ओळखत दे.भ. म्हणजे देशभक्त व बापूजी म्हणजे महात्मा गांधींना आदराने बापूजी म्हणत.
स्वातंत्र्य चळवळीचा जोर वाढत चालला होता सभा मिरवणुका यासारखे कार्यक्रम होते नानासाहेबांनी देखील धुळ्याच्या पाच कंदील चौकात विद्यार्थ्यांची मिरवणूक काढली व ती नेतृत्व केले या सरकार विरोधी मिरवणुकीमुळे नानासाहेबांना तात्काळ अटक करण्यात येऊन त्यांना दोन महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली . शाळेच्या मुख्याध्यापकांनी नानासाहेबांना माफीपत्र लिहून देण्याचे सांगितले . विद्यार्थी असल्यामुळे नानासाहेबांची माफीपत्र लिहून दिल्यावर शिक्षा न होता सुटका होणार होती . ध्येयाने प्रेरित झालेल्या नानासाहेबांनी शिक्षा भोगणे पसंत केले . माफीपत्र लिहून त्यांनी ब्रिटीशांपूढे लाचारी पत्करली नाही . देशसेवेसाठी नानासाहेबांचा हा त्याग पाहिल्यानंतर खरोखरच त्यांच्या नि : स्वार्थ जीवनाची खरी पावती मिळते .
आजही वयाच्या ७५ व्या वर्षी नानासाहेब शिक्षण प्रसाराचे राष्ट्रीय कार्य करीत आहे . आज स्वातंत्र्य सैनिकांना सरकारतर्फे मिळणाऱ्या सुविधा बघितल्या तर , वर्तमानपत्रातून बनावट स्वातंत्र्य सैनिकांचे शेकडो किस्से वाचून खरोखरच खेद वाटतो . आजही नानासाहेबांकडे तुरुंगवास भोगल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध आहे . मात्र सोयी सुविधांसाठी आजमितीस त्यांनी सरकारकडे अर्ज केला नाही .नी जे स्वातंत्र्य प्रचंड अशा त्यागातून उभे राहिले आहे . त्या देशाकडून आपल्यासाठी काही मागणे गैर आहे , असे अत्यंत हृदयद्रावक मत नानासाहेबांचे आहे.
नानासाहेबांचा हा त्याग , त्यांच्या नि : स्वार्थ जीवनाची जाणीव करुन देतो .
' कर्मामध्ये दिव्यानंद , सेवेमध्ये दिव्यानंद
नाही अन्य फळांचा छंद , नाही काही जरुर '
वरील काव्यपंक्ती साने गुरुजी लिखित ' आम्ही देशाचे मजूर ' ह्या कवितेतील आहेत . साने गुरुजींच्या ह्या काव्य ओळी नानासाहेबांच्या त्यागमय जीवनाचा परिचय करून देतात . खरोखरच नानासाहेबांचे संपूर्ण जीवन त्यागाचे साक्षात प्रतीक आहे . अशा थोर त्यागमयी शिक्षणमहर्षिला त्यांच्या अमृतमहोत्सव प्रसंगी उदंड आयुरारोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना !
***

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा