'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)
' There is always a lady
behind every successful man ' .
" प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .
नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची जबाबदारी उचलावी लागते . आणि त्यातूनच मग एक आगळंवेगळं कर्तृत्वमान , प्रेमळ परंतु समर्थ व्यक्तिमत्त्व उदयास येतं . लीलाताईच्या बाबतीत हेच घडले .रांजणगांवच्या श्री . नारायणराव चव्हाणांच्या सुसंस्कृत , खानदानी कुटुंबातील सुविद्य , कर्तबगार व ध्येयवादी उमदा तरूण श्री . यशवंतराव याचं स्थळ लीलाकरीता चालून आलं . दि . १२ में १ ९ ५२ रोजीलीला श्रीपतराव गायकवाडची ' सौ.सुशीला यशवंतराव चव्हाण ' झाली .
रांजणगावच्या चव्हाणांच्या संस्कारक्षम वाड्याच्या उंबरठयावरील माप ओलांडून नानांच्या जीवनात त्यांनी प्रवेश केला . सासू - सासरे , चुलतसासरे , एक विधवा - जाऊ , दीर , नणंदा , पुतणे , येणारा - जाणारा , पै - पाहुणा या वाढत्या प्रपंचात ताई थोडयाच दिवसांत रमून गेल्या . माहेरापासूनच माणसांची आवड . त्यामुळं सासरी जड गेलं नाही . सहवासानं प्रेम वाढतं असं म्हणतात . अल्पकाळात सर्वांनाच आपल्या मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाने त्यांनी आपलसं केलं . मुळात माती सुपिक असली तर " बीज " रूजायला काही त्रास पडत नाही . मानवी मनाचं ही असंच असतं .
सौ . सुशीलाताईंना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड , लग्नापूर्वी फक्त ८ वी पर्यंतच शिक्षण झालेलं . ताईंच्या मनातली पुढील शिक्षणाची तळमळ नानांनी ओळखली . ' अशिक्षितांना शिक्षित करण्याचा शिक्षकी पेशा ' तर नानांनी स्वीकारला होताच . ' Charity begins at home ' या न्यायानुसार त्यांनी ताईंना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले . मुळांत हुशार , अभ्यासाची आवड व त्यांत नानांचे मार्गदर्शन . त्यामुळे मॅट्रिकची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या. संसारी स्त्रीला संसार सांभाळून अशा एखाद्या महत्त्वाच्या परीक्षेत उज्वल यश प्राप्त करण्यासाठी जिद्द , कठोर परिश्रम , अभ्यासूवृत्ती व त्याच बरोबर थोरामोठयांचे आशीर्वाद हवे असतात , हे मी स्वानुभवावरून सांगते . ताईच्या बाबतीतही हे लागू पडते . परीश्रमाबरोबर प्रेमळ सासू - सासरे व आप्तस्वकीयांचे आशीर्वाद त्यांना लाभले .
मा . नानासाहेबांनी राष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृहाची , ' व्यवस्थापक म्हणून सर्व जबाबदारी स्वीकारली होती . दिवसेंदिवस वसतीगृहातील सर्व सोईयुक्त संस्कारक्षम वातावरणाने विद्यार्थी संख्या वाढत होती . शैक्षणिक वातावरणामुळे चाळीसगावांतील पुष्कळसे पालकही आपल्या पाल्याला वसतीगृहात ठेवित . महर्षिकर्वेनी महाराष्ट्रात स्त्री शिक्षण की मुहूर्तमेढ रोवली होती . याच धर्तीवर नानांनी चाळीसगावात ' स्त्रियांसाठी वसतीगृह ' सुरू केले . त्यावेळी स्त्री शिक्षणाची संकल्पना समाजात थोडीशी रुजली होती . परंतु स्त्री ने वसतीगृहात राहून शिक्षण घेणे ' हे समाजाला कितपत मान्य होईल याबद्दल ते साशंक होते . महिला वसतीगृहासाठी ' व्यवस्थापिका म्हणून एखादया प्रेमळ महिलेचीच नियुक्ती केल्यास त्यास चांगला प्रतिसाद मिळेल असा विचार करून श्री . नानानी सौ . ताईंवरच ही जबाबदारी टाकली . ताईंनीही हे आव्हान आनंदाने स्वीकारले . यानंतर ' वसतीगृहात विद्यार्थीनींना प्रवेश ' अशी जाहिरात १ ९ ५५ मध्ये प्रथम वर्तमानपत्रातून झळकली . त्यास अल्पसा प्रतिसादही मिळाला . सुरूवातीला विमल सुतार व हिराबाई पाटील या दोन विद्यार्थीनींनी प्रवेश घेतला . या दोघींची तर वसतीगृहाने मोफतच व्यवस्था केली पण ताईंनी धीर सोडला नाही. आज ना उद्या संख्या वाढेल असा त्यांचा विश्वास होता . झालेही तसेच . समाजात वैचारिक परिवर्तन झाले आणि त्याबरोबरच वसतीगृहातील संस्कारक्षम वातावरणाची किर्ती सभोवतालच्या परिसरात पसरली . मोठया संख्येने मुली वसतीगृहाचा लाभ घेऊ लागल्या . त्यांच्या न्याहरी , भोजनाच्या कामातही ताई जातीने लक्षा घालीत . वसतीगृहाची स्वच्छता सूचिर्भूत होती व संस्कारक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी त्या नेहमीच दक्ष असत .
लहानपणापासूनच त्यांना झाडा - फुलांची आवड वसतीगृहाच्या व डोळ्यांच्या धर्मार्थदवाखान्याच्या परिसरातही त्यांनी मुलींच्या मदतीने वृक्षारोपण करून आपला छंद जोपासला . त्याच बरोबर वसतीगृहाची व्यवस्थापिका म्हणून जबाबदारी अत्यंत चोखपणे बजावत असतांना त्यांनी या कामाचा कोणताही मोबदला ध्यायचा नाही असा कठोर निर्णय घेतला . वास्तविक सुखी संसारासाठी सगळया हौशी मोजी करण्यासाठी पैसा सर्वसामान्य व्यक्तीला फार महत्वाचा वाटतो . पण ताईनी या गोष्टीचा विचार न करता लहान सहान देणग्या मिळवून , वसतीगृहातील सर्व कामे काटकसरीने मुलीकडूनच करवून घेऊन सुमारे ६०,००० रू.ची संस्थेसाठी बचत केली . नानांइतकेच संस्थेच्या आर्थिक विकासाच्या वाटचालीत ताईचे हे योगदान महत्वाचे आहे .
कन्या छात्रालयाची जबाबदारी सांभाळत असताना संसाराकडेही लक्ष घालावे लागत असे . संस्थेच्या वाढत्या व्यापामुळे नानांकडे भेटायला , सल्ला - मसलतीला येणाऱ्या - जाणारयां चा राबता असे , चाळीसगाव शिवाय जवळपासच्या खेडयापाडयावरही संस्थेचा विस्तार झाला होता . या शाळांच्या विकासासाठी वर्गणी जमा करणे हेतर फार अवघड काम . त्यासाठी नाना सकाळपासूनच बाहेर पडत . ते रात्रीच परत येत . त्यामुळे घरातील सर्वचं कामे , येणारा जाणारा , पै - पाहुणा या सर्वांची सरबराई करणं , मुलांचा अभ्यास घेणं यांत ताई दिवसभर दंग असत . त्यात पुन्हा वसतीगृहाकडेही लक्ष देणं आलंच . या कामात तर कोणतीच तडजोड नाही . भरीस भर त्यांनी काही दिवस ' शिकवण्या ' ही घेतल्या . राष्ट्रीय प्राथमिक शाळेत बरीच वर्षे विनामूल्य नोकरी करून योगदान दिले व बालक मंदिरातही काही काळ नोकरी केली . ही सगळी त्यांची तारेवरची कसरत पाहिली की तांईंच्या भरीव कार्याची जाणीव होते .
परमेश्वरी योजना काही औरच असते . तो असलेल्या त्रासाची विवंचनेने ची दुसरीकडे कुठेतरी भर काढीत असतो ताई तशा भाग्यवानच सर्वच मुलं मुळातच हुशार सद् वर्तनी काटकसरी हात राखून योग्यवेळी योग्य तो खर्च करण्याची सवय त्यांना आपल्या आईवडिलांकडून लाभलेली . सत्ता असूनही कधी तिचा गैरवापर केला नाही .मुलांना शाळेकडून मिळणाऱ्या कोणत्याही सवलती,फी ,नादारी पुस्तके त्यांनी कधीही स्वीकारली नाही . आपल्यापेक्षा ज्यांना त्याची खरच गरज आहे त्यांना ते मिळाले पाहिजे हाच त्यांचा प्रमुख हेतू होता सर्वात मोठा डॉक्टर विनायक हा एफवाय बीएससी ला महाविद्यालयात सर्वप्रथम आला आणि त्यास' मेडीकलला ' प्रवेश मिळाला .ही बातमी तांईना कळली तेव्हा त्यांना आपलं जीवन कृतार्थ झाल्यासारखं वाटले . आपण घेत असलेल्या कष्टाचे योग्य फळ मिळाले यामुळे त्यांना खूप समाधान आणि आनंद झाला . कुटुंबात लहान भाऊ , मोठ्या भावाचं अनुकरण करीत असतात . त्याने आखून दिलेल्या मार्गावर चालण्याचा त्यांचा प्रयत्न असतो . मोठा विनायक , डॉक्टर ' झाल्यावर धाकटी भावंडे इंजिनिअर , प्राध्यापक , कॉन्ट्रॅक्टर अशी विविध क्षेत्रात लौकीक प्राप्त करीत आहेत . ही बाब विशेष उल्लेखनीय आहे .
मुलांप्रमाणे सर्व सुनादेखील उच्चविद्याविभुषित . पण अहंकाराचा स्पर्श नाही . जणूं चव्हाणांच्या घरात त्यांचा प्रवेश म्हणजे दुधात साखरच . ताईंप्रमाणेच आल्यागेल्यांचे आनंदाने स्वागत करतात . अशा आदर्श सुनांकडे पाहिल्यानंतर प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाईंच्या काव्यपंक्ती ओठावर येतात -
' माझी वाहारी ' सीताई ' हिचं मोठं मन देखा ,
देल्हा देवानं सभाव खडीसाखर सारखा . '
म्हणूनच सुनांविषयी बोलतांना ताईंच्या चेहेयावर समाधान झळकत असत .
भारतीय स्त्रीला पती हाच परमेश्वर . ती पतीबरोबर सप्तपदी चालते . हळदीच्या पिवळया पावलाने उंबरठयावरचे माप लवंडते . त्या दिवसापासून तिचे अस्तित्व हे पतिमय होते . तिचे स्वत : चे वेगळे जीवन राहत नाही . मा . नानासाहेबांच्या बरोबरीने संसारजीवनाची खडतर पण परम महान वाटचाल करतांना ताईंना माहीत होतं की , या खडतर वाटेवर भविष्यात हिरवळच - हिरवळ असणार आहे . आज मा . नानासाहेबांच्या या गौरवशाली अमृतमहोत्सवी निमित्ताने त्यांच्या हितचिंतकांनी घडवून आणलेल्या सोहळयात जो समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय , हे ताईंच्या जीवनतपश्चर्येच फळचं होय . म्हणूनच म्हणावंस वाटतं '
आहे तरी सर्वाठायी पाहो जाता
पाहो जाता कोठेचि नाही '
ती.स्व . नानासाहेब आणि ती.स्व . सौ . ताईंना या अमृतमहोत्सव - प्रसंगी दीर्घ आयुरारोग्य लाभून त्यांच्या कडून अधिकाधिक समाजोन्नती होवो अशी प्रभुचरणी प्रार्थना !
***

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा