ज्यां च्या नावातच विजयाची पताका आहे असे नानासाहेब यशवंत , गुणवंत व धैर्यवंत तर आहेतच पण त्याच बरोबर संतही आहेत कारण संत नामदेवांनी सांगितलेली संतसज्जनांची लक्षणे पहा-
निंदील हे जन सुखे निंदू द्यावे । सज्जनी क्षोभावे नये बापा निंदा आणि स्तुती समान पै झाली| त्याची स्थिती आली समाधीला |
शत्रू आणि मित्र समसमानत्वे । तोचि पै देवाते आवडला ।
माती आणि सोने भासे समान तो एकनिधान योगीराज ।
नामा म्हणे ऐसे संत जे असती । तेणे पावन होती तिन्ही लोक ॥
अडतीस वर्षापूर्वी माझ्या बहाळगावी त्यांच्याशी पहिली भेट झाली . त्यावेळी दोन देशसेवेसाठी , जनसेवेसाठी कार्यरत होते . महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण आणि चाळीसगावचे शिक्षणमहर्षी यशवंतराव नारायणराव चव्हाण , साधी राहणी , उच्च विचारसरणी हे त्यांचे साधे तत्वज्ञान . खादीचे पांढरेशुभ्र धोतर , पूर्णबाह्यांचा सदरा , डोक्यावर तशीच पांढरीशुभ्र टोपी , हातात लहानशी कापडी पिशवी आणि छत्री एवढ्या सरंजामासह नानाबाहेर पडतात . छत्री नाही पण पिशवी आजही असते . पिशवीलहान तिचे कार्य मात्र महान तिच्यात असतात पावतीपुस्तके , विनोबांची गीताई , नामदेव तुकोबांचे अभंग आणि सानेगुरुजींची पुस्तके .
नाना श्रमपंढरीचे वारकरी आहेत . श्रमदान हा त्यांचा स्थायीभाव आहे . आजच्यासारखी पूर्वी खेडोपाडी वाहनांची सोयनव्हती . त्यामुळे तरवाडे , वाडे , बहाळ , खेडगाव , पोहरे , कळमडू , दहिवद असा त्यांचा प्रवास पायीच असायचा . त्याच्या व जनताजनार्दनाच्या श्रमातूनच आजची ज्ञानमंदिरे उभी राहिली . आजही तरुणांच्या बरोबरीने श्रमदान करतात . तरुण थकतात पण ते नाही . श्रमसेवेत त्यांनी प्राचार्य , मुख्याध्यापक , शिक्षक , विद्यार्थी , सेवक , ग्रामस्थ सर्वांनाच सहभागी करुन घेतले . त्यामुळे ही आपली संस्था आहे , ही आपली शाळा आहे . हे आपले कॉलेज आहे अशीच सर्वांची भावना झाली आहे . या सर्व शैक्षणिक इमारती ज्या खेडोपाडी आणि शहरातून उभ्या राहिल्या त्या श्रमदानातून !
श्रमदान शिबिरात नानांचा सहवास म्हणजे एक आनंद असतो त्यात त्यांची बौद्धिके असतात . अभंग आणि गाणी म्हणण्यात सर्वांना ते सहभागी करुन घेतात . थकवा आणि वेळ कसा निघून जातो तेही कळत नाही . बोलणे अतिशय कमी पण श्रम मात्र भरपूर . ' बोले तैसा चाले ' या तुकोबांच्या वचनाप्रमाणे त्यांचं वागणं आहे .
नाना श्रमपंढरीचे जसे वारकरी आहेत तसे ते पंढरीच्या विठोबाचे निस्सीम वारकरी आहेत . त्यांचा जन्म वारकऱ्यांच्या घरात झाला . माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा || आजही त्यांच्या घरात ही वारी चालू आहे . नानांची वारी फक्त दोन दिवसांची , आल्या आल्या चंद्रभागेमध्ये स्नान करीत . पिशवीत विनोबांची , साने गुरुजींची , संतांची पुस्तके व फराळाचे घेत . दर्शनाच्या बारीमध्ये रांगेत अगदी शेवटी उभे राहात . रांगे मध्ये घुसण्यासाठी ओळखीच्या लोकांनी कितीही आग्रह केला तरी ते तिकडे दुर्लक्ष करून गोपाळपूरयाला शेवटच्या माणसामागे उभे राहून पंधरा ते वीस तासानंतरच विठोबाचे दर्शन घेत . श्रम घेऊन आणि धक्के खाऊनच त्यांनी देव पाहीला.
संत नामदेवांचा त्यांचा एक आवडता अभंग आहे .
काळ देहाशी आला खाऊ । आम्ही आनंदे नाचू गाऊ ॥१ ॥ . कोण वेळे काय गाणे । हे तो भगवंता मी नेणे ॥२ ॥
टाळ मृदंग दक्षिणेकडे । माझे गाणे पश्चिमेकडे ॥३ ॥
नामा म्हणे बा केशवा । जन्मोजन्मी द्यावी सेवा ।।४ ।।
विशेष म्हणजे हा अभंग ते गाऊन दाखवितात . ' जन्मोजन्मी द्यावी सेवा ' या चरणावर जास्त भर देतात . कारण हा अभंग ते जगतात . संत विनोबा , परम कारुण्य आणि मांगल्याची मूर्ती साने गुरुजी ही नानांची आराध्य दैवते आहेत . त्यांनी विनोबांजवळून श्रम घेतले तर साने गुरुजींजवळून सेवा घेतली . साने गुरुजी कथामाला दरवर्षी त्यांची पुण्यतिथी साजरी करते . विनोबांची ' गीताई ' आणि साने गुरुजींची ' मैत्री ' काव्यसंग्रह यांची संगत आजही नानांना आहे . साने गुरुजींची कविता सदैव त्यांच्या ओठावर असते .
नानांच्या सहवासात जे आले असतील त्यांच्या बरोबर श्रमशिबिरात व पायी दिडींत सामील झाले असतील त्यांनाच समजेल की नाना ही कविता का म्हणतात आणि आपल्या मागून सर्व श्रमसेवकांना का म्हणायला लावतात ? कविता शिकणं , शिकवणं आणि त्याहीपेक्षा ती जगण्यातच शाश्वत आनंद आहे . शिक्षक आणि विद्यार्थ्यांविषयी नानांच्या मनात नितांत आदर आणि जिव्हाळा आहे . अगदी लहान मुलाशीही ते आदराने बोलतील . पण कामचुकारपणा व टाळाटाळ करणाऱ्यांवर ते रागावतात . ते रागावणं देखील प्रेमाचे असते . बोर्डिंगमध्ये असतांना नानांनी विद्यार्थ्यांना आईचे प्रेम दिले पण त्याच बरोबर त्यांना शिस्तही लावली . आज या संस्थेतून हजारो विद्यार्थी , विद्यार्थीनी शिकून बाहेर पडत आहेत . अनेकांचे संसार सुखाचे झाले . ही ज्ञानाची गंगा त्यांनीच खेड्यापाड्यात नेली . गरीबातल्या गरीब मुलामुलींना शिक्षणाची दारे खुली झाली . सर्वत्र ज्ञानाचे मळे बहरले . श्रम करणाऱ्या नानांच्या हातांनी पंच्याहत्तरी ओलांडली . त्यांचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे . त्यांना दीर्घआयुष्य आणि आरोग्य लाभो ही पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो . श्रमपंढरीच्या ह्या महान वारक- याला शतश : प्रणाम !!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा