अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!!
नानासाहेब माझ्या लहानपणीच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा माझ्यावर उमटला आहे. माझे दोन मित्र श्री प्रकाश देशमुख (गायकवाड ) व श्री सुभाष ठोके यांना याची चांगली कल्पना आहे. आपण माझ्या जन्म वर्षापासून राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केले. तळागाळातील , गरीब दुबळ्यांची ग्रामीण व शहरी भागातील मुले शिकून सवरून सर्वंकष बनावेत . हा आपला त्यामागील निश्चितच हेतू होता . आपले अनेक शैक्षणिक संस्था , सामाजिक संस्था व शिक्षणाला पूरक अशी विविध मंडळे उभारणीत योगदान आहे . विनोबांच्या , भूदान चळवळीत आपण सहयात्री होते व आजही आपण कांचनमुक्ती आंदोलनाचे सैनिक म्हणून व ग्रामीण भारताच्या परिवर्तनाचा वसा घेतला आहे . आपल्या या विशाल कर्तृत्वामुळे यंदाचा ' नंदिनी ' पुरस्कार थोर साहित्यिक मा . राम शेवाळकर यांच्या शुभहस्ते आपणास प्रदान करण्यात येत आहे .पुरस्काराचाच गौरव होत आहे एवढे आपले कार्य थोर आहे .
नाना , आम्ही सहा भांवडे , वडिलांची परिस्थिती सर्वसाधारणच . सहा अपत्यांना ते निश्चितच दुसऱ्या ठिकाणी शिकवू शकले नसते . तळेगावी आपण सुरु केलेल्या माध्यमिक शाळेतच आम्ही शिकलो . परिणामी सर्व नोकरीस लागलो . तळेगावी हायस्कूल नसते तर रोजंदारी करण्याशिवाय पर्याय नव्हता . आम्हासारख्या असंख्य ग्रामीण भागातील कुटुंबाच्या भलेपणात निश्चितच आपला सहभाग आहे . हे मला या प्रसंगी विशेषत्वाने सांगावेसे वाटते . नानासाहेब आपल्या वयास ७५ वर्षे पूर्ण होत आहेत . आपले अमृतमहोत्सवी वर्ष आहे हा योगायोगच आहे . आपल्या अमृतमहोत्सवी वर्षी संस्था व तालुक्याच्या वतीने आपला सत्कार होत आहे . मी व माझ्या पत्नीने त्यात फुल ना फुलाची पाकळीच्या रुपाने सहभाग घेतला आहे . नाना , दीनदुबळ्यांना , तळागाळातील व अंध अपंगांना शिक्षण प्राप्त करुन देण्यासाठी परमेश्वर आपणास आयुरारोग्य व दीर्घायुष्य देवो . हीच प्रभुचरणी प्रार्थना .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा