चाळीसगावचे जेष्ठ कार्यकर्ते श्री.नानासाहेब चव्हाण गुणग्राहक आणि रसिक व्यक्तिमत्व(श्री.सोमनाथ परब,गीत संघटक:एक सूर एक ताल,13/अे,आनंदाश्रम शिक्षण महर्षी दादा साहेब रेगे मार्ग,शिवाजी पार्क,मुंबई)
खान्देशात प्रकाशभाईची मंगलयात्रा सुरु होती . या यात्रे मी सहभागी झालो होतो , श्री . नानासाहेब चव्हाण यांनी या मंगलयात्रेचे संपूर्ण नियोजन केले होते . तेही या यात्रेत सहभागी झाले असल्याने मला या गुणग्राहक आणि रसिक व्यक्तिमत्त्वाचा जवळून परिचय झाला . प्रथमदर्शनी गंभीर , मितभाषी वाटणारे नानासाहेब सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात चटकन एकरुप होताना मी अनुभवले . संकल्प आणि कार्यवाही याचे अचूक गणित साधण्याचे कौशल्य व कार्यकर्त्यांना कार्यप्रवृत्त करण्याचे कसब हे नानांचे खास वैशिष्ट्य आहे . मंगल यात्रेचा मार्ग , वाटेतील गावा गावातून यात्रेचे महत्त्व पटवून देऊन , त्या गावातील आबाल वृद्धांना गावाच्या वेशीवर स्वागताला प्रवृत्त करणे यासाठी नानांनी आपल्या संस्थेतील शिक्षक - सेवक कार्यकर्त्यांना अनुभवसिद्ध मार्गदर्शन केले होते . शाळाशाळांमधून जाऊन हे कार्यकर्ते मंगलयात्रेचे महत्त्व , हेतू सांगत असत . ज्या मार्गावरुनही मंगलयात्रा जाणार असेल त्या मार्गावरील गावातून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत राहिला . मोठ्या प्रमाणावर मंगल साहित्याची विक्री झाली . याचे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे कारण म्हणजे श्री . नानासाहेब चव्हाणांचे रेखीव नियोजन , त्याच बरोबर त्यांनी सामाजिक बांधिलकीने उभे केलेले शिक्षण संस्थेचे कार्य तत्वज्ञान आणि व्यवहार यांची सांगड घालून संधी वंचित समाजाला शिक्षणाची संधी मिळवून देण्याचे फार मोठे कार्य नानांनी केले आहे . त्यामुळे नानांचा शब्द ही एक शक्तीच होऊन राहिली आहे , याचे पावलोपावली प्रत्यंतर येत गेले .
मंगलयात्रा मुंबईहून नाशिकमार्गे अंमळनेरला पोहोचली त्यावेळी नानासाहेबांनी या मंगलयात्रेतील यात्रेकरूंचे स्वागत अत्यंत भावभक्तीने प्रचंड उत्साहाने भव्य - दिव्य स्वरुपात केले . पूज्य साने गुरुजींच्या बद्दलचा नितांत आदर व विचार आचारावरील श्रद्धा यामुळे संपूर्ण खान्देशात मंगल यात्रा अपेक्षेपेक्षा यशस्वी झाली . माणसांच्या मनाची मशागत नानांनी करुन ठेवली होती म्हणूनच हे भरघोस यश मंगल यात्रेला मिळाले असे मला मनापासून वाटते . नानासाहेब स्वत : जातीने या यात्रेतील सहभागी घटकांची विचारपूस करीत . कोणताही उणेपणा राहू देत नसत . एवढा मोठा शिक्षणतज्ज्ञ व समाजमान्य जेष्ठ नेता आपली काळजी करतो आहे हे पाहून आमचा थकवा आणि व्यक्तिगत अडचणी कोठल्या कोठे पळून जात . आमची कार्यशक्ती दुप्पट होते आहे असे वाटत राही चाळीसगावी आम्ही पोहोचलो . खान्देशातील संपूर्ण नियोजनानंतर श्री . नानासाहेब आपल्या गावी आमच्या स्वागताला आले होते . वयाची सत्तरी ओलांडलेले नाना आमच्या ' एक सूर एकताल ' कार्यक्रमात लहानात लहान बनून सहभागी होत . अभिनयासह गाणे म्हणत आणि या उपक्रमाला आलेल्या बघ्या मंडळींना स्फूर्ती देऊन सहभागी करुन घेत . समारंभात आपले मोठेपण विसरुन तल्लीनतेनेसहभागी होणारे महाभाग वचितच पाहाण्यात येतात . नानांमधील हे अपवादात्मक रसिकत्व मी अनुभवत आलो आहे .
स्फूर्तिगीते , बालगीते , बडबडगीते तितक्याच आवेशाने साभिनय म्हणणारे नानासाहेब पाहून शिक्षक , पालक सर्व समुदाय या गीत गायनाच्या कार्यक्रमात सहभागी होत असे . चाळीसगावामधील आपल्या शिक्षण संस्थांच्या सर्व विभागातून नानांनी मला समुहगीते शिकवण्यासाठी नेले . नानासाहेबांच्या बरोबर जातांना मला संकोचल्या सारखे होई . कारण नानांच्या विषयीची आदरयुक्तभावना व समर्पण वृत्तीची जाणीव पाहून या रसिक महापुरुषाचे मोठेपण मला अधिकाधिक जाणवत गेले . प्राथमिक शाळेतील मुले , वसतीगृहातील मुले , माध्यमिक शाळेतील मुले आणि महाविद्यालयातील युवकांना नानासाहेबांचा आधार वाटत आहे हे पाहून आणि अंधशाळेपासून व्यावसायिक शिक्षण विभागापर्यंतची अध्यापन प्रक्रिया ती . नानासाहेबांच्या प्रचंड कार्यशक्तीची व कार्यतत्परतेची आविष्कार ठरते .
आज नानासाहेबांचे अमृतमहोत्सवी संवत्सर आहे ! या पंचाहत्तर वर्षाचा नव्या उमेदीचा , निष्कलंक चारित्र्याचा , गगनाला गवसणी घालू शकणारा युवक ! मला भारतीय युवाशक्तीचा प्रतिनिधीच वाटतो . एक सेवाभावी , प्रचंड उमेद बाळगून जीवन सार्थकी लावणाऱ्या या शिक्षणमहर्षीला माझे विनम्र अभिवादन .


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा