गु रुर्ब्रह्मा , गुरुर्विष्णु , गुरुर्देवो महेश्वर :
गुरुर्साक्षात् परब्रमह्य , तस्मै श्री गुरवे नमः ।।
आदरणीय श्री . नानासाहेबांबद्दल माझ्या सारख्या पामराने काही लिहिणे , म्हणजे साक्षात सुर्याला दीपक दाखविण्या सारखे होईल . कमरेला धोतर , अंगात खादीचा पांढरा गुरुशर्ट व डोक्यावर गांधी टोपी घातलेले नाना बघितले तर पूज्य सानेगुरुजी अगर .विनोबाजी भावे यांची आठवण झाली नाही , तरच नवल ! धार्मिकता व वारकरी संप्रदायाचे बाळकडू बाळबोध वयातच नानांना मिळाले ते त्यांच्या घरातूनच . एक रुपया महिन्याने टपाल वाटप करुन प्राथमिक शिक्षण घेणारे नाना , बडोदा येथील समाजी मराठा वसतीगृहात कामकाजकरुन अर्धनादारीची सवलत मिळविणारे नाना , पुण्यात लॉ - कॉलेजच्या वसतीगृहाच्या खानावळीत परिश्रम करुन दोनवेळचे जेवण मिळविणारे नाना , न कळतच जिद्दीचे व स्वावलंबनाचे धडे शिकवून जातात , अशाप्रकारे विद्यार्थी दशेतच हालअपेष्टा सोसलेल्या नानांनी खेड्यापाड्यात राहणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत गैरसोयी व गरजांचे ' मर्म ' जाणून चाळीसगाव सारख्या तालुक्याच्या व मध्यवर्ती ठिकाणी प्रथमत: वसतीगृह सुरू केले व त्यांतर आजपर्यंत चाळीसगाव तालुक्यातच नव्हे तर भडगाव व पाचोरा तालुक्यातही या 'भागीरथाने' खेडोपाडी ही ' ज्ञानगंगा' आणून सोडली.
सकाळी ७-०० वाजेपासून नानांची पायी भ्रमंती सुरु झाली म्हणजे जेवणा - खाण्याची व वयाचीही तमा न बाळगता रात्री ९ ते १० पर्यंत नाना विविध संस्थांना भेटी देवून बारकाईने निरीक्षण करुन , संबंधितांना मार्गदर्शन करीत असतात . एखाद्या संस्थेचे बांधकाम सुरु असले तर , एखादा मालकही स्वत : चे घर बांधतांना कष्ट घेत नसेल इतके कष्ट नाना संस्थेच्या बांधकामासाठी चेअरमन या नात्याने घेत असल्याचे दिसतात . संस्थेचे बांधकाम सुरु असतांना मजुरांच्या आधी नाना बांधकामावर हजर असतात . मग ते बांधकाम चाळीसगावी असो , सारव्याला असो की शिरसगावला असो . विद्यार्थ्यांकडून बांधकामात श्रमदान करुन घेतांना नाना स्वत : सर्वांच्यापुढे डोक्यावर वाळुची पाटी घेवून पुढे दिसतील . या प्रकाराची संस्थेच्या प्रगतीची अंत : करणापासूनची तळमळ , त्याग व समर्पणाची भावना आज देशात एखाद्या ठिकाणीतरी पहावयास मिळेल असे वाटत नाही . त्याचाच परिपाक म्हणून समाजातील सर्व थरातील वर्गणीदारांच्या मदतीने नानासाहेबांनी वसतीगृहे , प्राथमिक शाळा , आश्रमशाळा , अंधशाळा , माध्यमिक विद्यालये , महाविद्यालये , तांत्रिक विद्यालये अशा एकूण ४६ शाखांचे जाळे अवघ्या ४४ वर्षात विणून काढले .
सामाजिक व शैक्षणिक कार्यात नानासाहेब सदैव अत्युच शिखरावर राहिले . अखिल भारतीय आचार्यकूलात कार्यकारिणीत १५ वर्षे कार्य केले . अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेचे तर ते आजतागायत कोषाध्यक्ष आहेत . चाळीसगावी ' साने गुरुजी कथामाला ' साठी हॉल बांधून लायब्ररी चालू करण्याचा त्यांचा मानस केवळ स्तुत्य असून लवकरच त्याचा शुभारंभही होईल यात संशयच नाही . महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण बोर्डाचेही सदस्यत्व त्यांनी तीन वर्षे भुषविले . तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक संघ महामंडळाचे १ ९ ७१ पासून ते सदस्य आहेत . अरविंद संस्कार केंद्राचेही श्री . नानासाहेब हे संस्थापक आहेत . इतकेच नव्हे तर आचार्य विनोबाजी भावे यांचे सोबत भूदान चळवळ व भावजागरण दिंडीत आणि साने गुरुजी मंगल यात्रेतही नानांनी हिरीरीने सक्रीय भाग घेतला . संस्थेतही वृक्षारोपण , खेळांच्या व विविध स्पर्धांचे कार्यक्रम नानासाहेब सातत्याने आयोजित करीतच असतात . राष्ट्रीय य सहकारी शिक्षण मंडळाचे ते सन १ ९ ५३ पासून संस्थापक , सेक्रेटरी , व्हा . चेअरमन व आता चेअरमन पदावर १ ९ ८७ पासून असूनही लोभ व अहंकाराची नानासाहेबांना स्पर्श करण्याची ताकत झाली नाही . नाना साहेबांनी कधी प्रसिद्धीची हाव धरली नाही . पक्षाचे राजकारण नानासाहेबांनी कधीही केले नाही . नानासाहेबांचा एकच पक्ष आहे तो म्हणजे शिक्षण पक्ष . त्यासाठी नानांनी आपले उभे आयुष्य वेचले . शेकडो कुटुंबांना नानांनी पोटापाण्यास लावले . लक्षावधी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे अमृत पाजले . असे करतांना संस्थेच्या वार्षिक अहवालात आपले व कार्यकारिणीचे फोटो छापण्याचा सुद्धा नानांना मोह झाला नाही . चाळीसगाव तालुक्यातील शिक्षणाचा इतिहास लिहावयास झाल्यास नानासाहेबांचे नाव सुवर्णाक्षरातच लिहावे लागेल यात शंका नाही .
असे शिक्षणक्षेत्र हेच कर्मभूमी मानणारे कर्मयोगी , शिक्षणक्षेत्रात भीष्म कामगिरी करणारे भीष्माचार्य , याच क्षेत्रात ४६ वर्षे अव्याहत तपश्चर्या करणारे शिक्षणमहर्षी , आदरणीय श्री . नानासाहेब यांना यापुढेही , यापेक्षाही जास्त भरीव कामगिरी करणेसाठी उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा