मुख्य सामग्रीवर वगळा

धैर्याचा महामेरू (प्रा.म.सु.खैरनार,चाळीसगाव)

 

रामजणगावच्या गढी शेजारी माती - शेणानं सारवलेल्या भिंती असलेलं अत्यंत स्वच्छ , चौसोपी , प्रशस्त घर , ओसरीच्या खुंटीवर टांगलेले टाळ , पाटावर ठेवलेली ज्ञानेश्वरी व बाजूला असलेली वीणा . डोईवर भरदार पागोटे , प्रसन्न चेहरा , निरागस डोळे , झुबकेदार मिशांतून खुललेली पारमार्थिक चर्चा . , ज्ञानदेव , तुकारामांच्या ओवी - अभंगातून शेत - मळयाचे भान विसरलेले दादा आणि आल्या - गेलेल्यांची आस्थेने वास्त - पुस्त करुन त्यांच्या आतिथ्यात कमी पडू नये म्हणून स्वत : ला पुरते विसरलेल्या नानांच्या मातोश्री . ' प्रपंची असावे । असोनि नसावे । ' अशा वारकरी कुटुंबातून नानांची जडण - घडण झाली . सावकारी , जमीनदारी गाव . दादा आणि आजींनी स्वत : तालेवार नसूनही आल्या - गेलेल्यांची निकङ पुरी करावी , भाकरीतला घास - तुकडा देऊन भुकेल्यांची भूक भागवावी . प्रेमानं विचारपूस करावी . देता येईल तेवढं देत रहावं , लहान - मोठयांचं कोड कौतुक करावं , मायेच्या चार शद्वांनी गावातील सायऱ्यांवर , कारु - नारूंवर , बलुतेदारांवर , सालदारांवर , त्यांच्या लेकी - बाळींवर , पै - पाहुण्यांवर प्रेमाचा वर्षाव करावा असं हे मोठया मनाचं . दिलदार अन्त : करणाचं , साधु सत्पुरुषाचं घर सर्वांसाठी खुलं होत . जात , धर्म , पंथ , श्रेष्ठ - कनिष्ठ , उच्च - नीच या सर्वांना दादांनी तिलांजली दिली होती . समत्व , शुचित्वाचा पायरव घरात होता . अशा वातावरणात नानांच्या  वैचारिक , भावनिक व सामाजिक पिंडाची जडण - घडण साकारत होती . 
' शुध्द बीजा पोटी । फळे रसाळ गोमटी । ' पुत्र व्हावा ऐसा गुंडा । ज्याचा तिही लोकी झेंडा ।। ' ' कुळी कन्या - पुत्र असती जे सात्विक । तयाचा हरिख वाटे देवा ।। '
   यासारखी वचने अधुन - मधून कानावर पडत . परंतु घरातील सोज्वळ , पारमार्थिक , संस्कृती संपन्न आचरणातून नानांच्या व्यक्तीमत्वात कळत - न - कळत बदल होत गेले . कायद्याचे पदवीधर होत असतांनाच दादा आणि आजीच्या संस्कारांनी मंडित झालेल्या नानांचे अंत : करण अठराविश्वे दारिद्रयात खितपत पडलेल्या बहुजन समाजाच्या व्यथा - वेदनांनी गहिवरून येई . ज्ञानेश्वरांच्या ' ज्ञानेश्वरीने ' , तुकोबांच्या ' गाथेने ' , विनोबांच्या ' गीताई ' ने आणि सानेगुरूजींच्या ' श्याम ' , श्यामची आई , पत्री ' ने नानांच्या अन्तर्बाहय जीवनात बदल घडवून आणला . ' गोर - गरीब , दीन - दलित , त्रस्त बहुजन समाजाविषयीच्या तळमळीने नानांनी आपले जीवनसूत्र निर्धारित केले . ' बहुजन हिताय । बहुजन सुखाया ' हा त्यांच्या उक्ती आणि कृतीचा धागा बनला . पन्नास वर्षापूर्वीच्या महाराष्ट्रीय समाजातील होत असलेल्या परिवर्तनाची पार्श्वभूमी आणि चिंतन मननातून मनाचा ठाम निश्चय झाला . परिपूर्तीच्या दिशेने टाकलेली विचारपूर्वक पाउले नानांच्या प्रारंभीच्या जीवनकार्यातील या काही ठळक पाऊलखुणा , 
  पन्नास वर्षापूर्वीच्या कायद्याच्या पदवीधराला लठ्ठ पगाराची नोकरी स्वीकारून फर्स्ट क्लास गॅझेटेड ऑफिसर म्हणून माना सन्मानाने , सुखा - समाधानाने जीवन जगता आले असते . आणि ' मला काय त्याचे ' ? अशा बेफिकीर वृत्तीने जीवन घालविता आले असते . परंतु ' अंतरीचे धावे । स्वभावे बाहेरी । यत्न परोपरी करोनिया ।। ' या उक्तीप्रमाणे नानांच्या समोर फक्त स्वत : चा संसार नव्हता . दृष्टी केवळ स्वकीयांपुरतीच मर्यादित नव्हती . केवळ घरादारापुरताच मर्यादित विचार नव्हता . गांधीजींच्या आंदोलनाने नानांच्या मनात पुरते घर केले होते . असहकार , सत्याग्रह यासारख्या आंदोलनात सक्रीय सहभागही नानांनी घेतला . परंतु नानांचा पीड हा राजकारणाचा नव्हता . जोतिबा फुले , कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आदर्श त्यांचे समोर होते . बहुजन समाजासाठी शिक्षण हाच मरणोपाय आहे अशी खात्री पटताच नाना शिक्षण क्षेत्रात उतरले . शिक्षकी पेशा पत्करला . अल्पावधीतच नाना विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जाऊ लागलेत . नानांनी गणित , भूमिती शिकविता शिकविता जीवनाचे गणित शिकवावे . भूमितीतील प्रमेये शिकवितांना जीवनातील प्रमेये सोडविण्याची दिशा दाखवावी . साने गुरूजींचा आदर्श हाडी - मांसी खिळलेले नाना अल्पावधीतच ' हाडाचे शिक्षक ' ( Born Teacher ) म्हणून पंचक्रोशीत नावारूपाला आलेत .
 ' A Teacher is a Social Engineer . ' शिक्षक हा खऱ्या अर्थाने समाजाचा शिल्पकार असतो  . म्हणून केवळ शाळेत शिक्षणदानाचे पवित्र कार्य करीत जीवन व्यतीत करावे की बहुजन समाजासाठी फुले , भाऊराव पाटील , गाडगे महाराज यासारख्यांच्या समर्पण वृत्तीने कार्य करणाऱ्यांचा आदर्श समोर ठेवून व्यापक , सर्वसमावेशक स्तरावर कार्याला वाहून घ्यावे या द्वंद्वातून नानांनी स्वत : ला सावरले . समाजाची सेवा म्हणजे असिधाराव्रत . तारेवरची कसरत , हाती भिकेची झोळी , प्रतिगाम्यांच्या टीकेचा विषय , उपेक्षित जीवनाचा साक्षीदार आणि प्रसंगी चारित्र्य हननाचा बळी ! प्रस्थापितांची मक्तेदारी कमी करतांना या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे . याची मनोमन खात्री करून अतुल धैर्याने आणि प्रखर निष्ठेने नानांनी तनमनधनाने हे सतीचं वाण स्वीकारलं आणि तालुक्यातील मुलामुलींचे ते सानेगुरूजी बनलेत ! 
    १ ९ ५८ ते ६० या काळातला राष्ट्रीय वसतीगृहातला मी विद्यार्थी होतो . खड्डा जीनमधील राष्ट्रीय विद्यालय ही माझी शाळा होती . या शाळेतून स्वावलंबनाचे , कर्तव्याचरणाचे , मानवतेचे , भूतदयेचे समता - स्वातंत्र्यअन् बंधुभावाचे , चारित्र्याचे , राष्ट्रनिष्ठेचे धडे नानांनीआम्हा विद्यार्थ्यांकडून गिरवून घेतले . शरीराबरोबरच मनाचीही मशागत करवून घेतली . शिस्तबध्द जीवनाची आणि चांगल्या सवयींची आवश्यकता सांगून शारीरिक कष्ट , अन्यायाचा प्रतिकार वाचनातील रुची , दैनंदिनी लेखन , श्रमदान , सायंकालीन तशीच प्रात : कालीन प्रार्थना साफ - सफाई यासारख्या अनेकानेक गोष्टींनी   विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती कशी होईल याकडे नानांनी जातीने लक्ष पुरविले . आम्हा विद्यार्थ्यांना नानांनी नुसत्याच पुस्तकी ज्ञानाने पुस्तकी - किडा बनविले नाही तर जीवनातील आव्हाने स्वीकारण्याचे धैर्य विद्यार्थ्यांच्या ठायी कसे उत्पन्न करता येईल याचा ही ध्यास घेतला . नानांच्या करडया व कठोर शिस्तीचा प्रसाद माझ्या काही सहाध्यायांनी अनुभवला आहे . पण त्यामागे मातृदयाचा ओलावा व पित्याच्या कठोर भूमिकेचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नसे . 
  मार्च ६० मधील ११ वी ची बोर्डाची परिक्षा प्रथम श्रेणीत संपादन करून उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या अनाथ विद्यार्थी गृहात प्रवेश मिळविण्याची खटपट मी करीत असतांनाच नानांनी मला वाघळी शाखेवर लेखनिक - कम - शिक्षक म्हणून रवाना केले . १ ९ ६५ गध्ये डेप्युटेशनवर बी.एड् . साठी धुळयाला पाठविले आणि ६८ ६ ९ मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन व्होकेशनल गाइडन्स साठी मुंबईच्या एल्फिन्स्टन इन्स्टिटयूट मधे धाडले .व्हालंटरी शिक्षकाच्या मुलाला नानांनी दिलेला हा हात ! अशीच माया नानांनी आम्हा अनेक विद्यार्थ्यांवर केली . नानांनी लावलेला हा ' जीव ' आठवला म्हणजे या धैर्याच्या महामेरुपुढे नतमस्तक व्हावेसे वाटते . आज माझ्या सारख्या गोर - गरीब , बहुजन समाजातील असंख्य मुला - मुलींचे जीवन नानांनी सुरू केलेल्या शाळांनी उजाळून निघालेले आहे . ज्यांना सकाळ - संध्याकाळची भ्रांत अशांना नानांनी प्रेमाने सांभाळले . त्यांना धीर दिला आणि ताठ मानेने जीवन जगण्याची , सुरू केलेल्या शाळांमधून प्रेरणा दिली . शिक्षणाची गंगा खेडयापाडयांपर्यंत पोहचवून नानांनी सर्वांना शिक्षणाची दुर्मिळ संधी उपलब्ध करून दिली . आज राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचा शाखा विस्तार पाहिला म्हणजे नानांच्या निरपेक्ष कार्याची महती जाणवते . 
   १ ९ ७२ मध्ये एम.ए. परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याचे वृत्त नानांना समजताच नानांना झालेला विलक्षण आनंद आजही माझ्या चक्षूं समोर जशाचा तसा उभा राहतो . प्राध्यापक म्हणून शहादा कॉलेजमध्ये रूजू होण्यापूर्वी नानांचा आशीर्वाद घेण्यासाठी  गेलो असताना नानांचे आनंदाने डबडबलेले डोळे खूप काही सांगून गेले . म्हणून तर नानांचा विद्यार्थी , राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचा सभासद , ६० ते ७२ अखेरपर्यंतचा एक सहकारी शिक्षक म्हणून सांगताना मला खरोखरच धन्यता वाटते . नानांचे मार्गदर्शन ज्यांना - ज्यांना लाभले , त्यांच्या जीवनाचे सोने झाले . परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने व्हावे , तद्वत नानांच्या सहवासात जे आलेत , त्या सर्वांनाच अभूतपूर्व अशा जीवनाचा लाभ झाला . त्याच्या मोबदल्यात नानांनी काय मागीतले म्हणाल , तर केवळ कृतज्ञता ! शाळांसाठी नानांनी हाती झोळी घेऊन अथक पायपीट केली . पै - पै जमवून , स्वतःश्रमदान करून शाळेच्या इमारती उभ्या केल्यात . तांत्रिक शिक्षणाचीही सोय केली.तशीच अंध - अपंग , भटक्या विमुक्त जाती - जमातीच्या मुला - मुलींसाठी आश्रमशाळाही सुरू केल्यात . महाविद्यालय सुरू करून उच्च शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून काळजी घेतली . बालवाडीपासून उच्च शिक्षणापर्यंतचा हा एकखांबी तंबू अव्याहतपणे गेल्या पाच दशकांपासून नानासाहेब समर्थपणे सांभाळत आहेत . हा त्यांचा आदर्श नव्याने शिक्षणसंस्था सुरूकरणाऱ्यांना प्रेरक ठरणारा आहे . 
   एवढा मोठा पसारा सांभाळणाऱ्या नानांच्या जीवनात आजही तीच पायपीट आहे . आजही तोच खादीचा जाडाभरडा वेश अंगावर  आहे . तोच साधेपणा . तेच साधन शुचित्व , तीच साधना , उपासना . जी दादांनी व आजींनी आपल्या आचार - विचारातून त्यांचे समोर ठेवली . ज्ञानेश्वरीतील पसायदानास आपण पात्र व्हावे म्हणून तीच घडपड , तीच धावपळ आजही वयाची पंच्याहत्तरी उलटली तरी , नाना आज पूर्वीच्याच उमेदीने , जिद्दीने , नेटाने कार्य करीत असल्याचे दिसून येते .
    शिक्षणाचे कार्य करीत असतांनाच नानांनी सामाजिक , सांस्कृतिक , धार्मिक , आचार्यकुल , भूदान - ग्रामदान चळवळ , आंतरभारती , सानेगुरूजी कथामाला , ग्रामीण वाचनालये , विविध चर्चासत्रे , कृती - प्रकल्प , संमेलने , शिबीरे , शासनाच्या सुधार योजना यासारख्या विधायक उपक्रमांना सक्रीय पाठिंबा दिला . विविध शाखांतील अध्यापक वर्ग कृतीप्रवण एवं अद्यावत रहावा म्हणून त्यांनाही विविध योजनात सहभागी करून घेतले . पालक वर्गाशी अनुसंधान राखून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून विविध कलागुणांचा , क्रीडा नैपुण्याचा विकास साधला . नानांची दूर दृष्टी त्यांच्या इमारतींच्या उभारणीतून , सेवक वर्गाच्या निवडीतून दिसून येते . या दुर्मिळ गुणांचा समन्वय नानांच्या व्यक्तिमत्वात झालेला असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत या शिक्षणमहर्षीचे नाव जाऊन पोहचले आहे . कामाचा हा प्रचंड उरक सांभाळून ज्ञानेशांच्या ज्ञानेश्वरीची आणि तुकारामांच्या गाथेतील अभंगांची संगत करणाऱ्या नानांकडे पाहिले म्हणजे या धैर्यधरापुढे विनम्र व्हावेसे वाटते .
 आपल्या संस्थेतील मुला - मुलींचा भाग्यविधाता , पालकांनी निश्चिंतपणे पाल्यांची टाकलेली जबाबदारी पेलणारा , सहकारी सेवक वर्गास आस्थेने , आपुलकीने मार्गदर्शन करणारा , थोर दिलाचा , नि : स्पृह , निर्भिड , अखंड झिजणारा , तापसी शिक्षण महर्षि म्हणून नानांचे नांव खानदेशच्या शैक्षणिक इतिहासात नोंदविले जाईल . धैर्याच्या या महामेरूला उदंड दीर्घायुरारोग्याचा लाभ होवो अशी प्रभुचरणी प्रार्थना करून हे शब्दसुमन नानासाहेबांच्या चरणकमलयुग्माशी विनित भावाने सादर करतो .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...