माननीय नानासाहेबांची ओळख १ ९ ५ ९ साली कै . रामराव जिभाऊ यांचे सान्निध्यांत प्रथम झाली . दोघांचे संस्थेच्या कामकाजाबाबत मंथन चालू होते . सुखसंवाद चालू होता . हा मुलगा कोण ? म्हणून परिचय झाला . कॉलेजमध्ये शिकत असतांना घरुन येणारा डबा खाण्यासाठी वसतीगृहात येत असे . अधूनमधून कामकाजाच्या माध्यमातून भेट होत असे . एवढ्याच संबंधातून पुढील जीवनातील कार्याने नानासाहेबांनी बरेच शिकविले . नानांचे आदर्श व लोकोत्तर पुरुषाचे जीवन हे आपणसाठी प्रात्यक्षिक आहे . ध्येयपूर्तीसाठी , अडीअडचणीवर हिंमतीने मात करुन समाजसेवा करीत आहेत . ध्येयाशी एकनिष्ठ , अचल , तेजस्वी , सत्वशील राहून कार्य करीत आहेत . यशाने न बिघडता , अपयशाने निराश न होता , कर्मामागील हेतू चांगला असल्यामुळे निर्भयपणे कार्य चालू आहे . कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता , आदर्शध्येयनिष्ठा , जीवननिष्ठा , ईश्वरावर निष्ठा ठेवून , संयमीबुद्धी , दक्ष विचार व कार्यकुशलता यामुळे आज संस्थेच्या कार्याचा वटवृक्ष झालेला आहे . यामध्ये त्यांच्या कृतीशील ज्ञान व प्रभावी नेतृत्वाची झलक आहे .
नानांच्या प्रयत्नवादाची फलश्रुती ४६ शाखांतून २५,००० विद्यार्थ्यांचे शिक्षण आपण पहातच आहोत . यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे . केल्याशिवाय मिळत नाही , केलेले फुकट जात नाही . काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे , काम करीत जा , हाक मारीत जा , या उक्तीप्रमाणे सार्थ जीवनाचा विचार केलेला आहे. त्यांचे कुटुंबात धार्मिक संस्कार होते . श्री क्षेत्र वालझिरी संस्थेत सहभाग , संस्कार केंद्राची स्थापना , संत विनोबा व साने गुरुजी अशा आदर्शाचा सहवास , गीताई पदयात्रा , भाव जागरण दिंडी , गीताई प्रतिष्ठान मधील योगदान , गीताई अभ्यास केंद्र , गीताई प्रवचनाच्या प्रती खपविणे या सर्व कार्यातून त्यांच्यावर अध्यात्मिक संस्कार असल्याचे दिसते . राजकारणाला व समाजसेवेला अध्यात्माची जोड देवून समाजाची आर्थिक , सामाजिक , बौद्धिक व अध्यात्मिक उन्नती करणे हा खऱ्या अर्थान लोकसंग्रह आहे . तो नानांकडे आहे .
कर्मयोगी हात , ज्ञानी नेत्र , विलक्षण शांती व भक्तीयुक्त हृदय असा संगम नानांच्या जीवनात झालेला आहे . ते आदर्श व लोकोत्तर पुरुष आहेत .
प्रयत्नानंतर यश मिळून देखील अंहकार नाही , तिरस्कार नाही , निरपेक्ष प्रेम , संयमी बुद्धीने जीवन जगण्याचे प्रात्यक्षिक नानासाहेबांनी समाजापुढे ठेवलेले आहे , त्याग , तप , स्नेह , सहकार असे भावयुक्त अहंकार विरहित निस्वार्थ , निरपेक्ष जीवन जगवून दाखवित आहेत . स्वत : परीश्रम करुन कायद्याचे शिक्षण पूर्ण करुन , शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा देवून समाजसेवेचे व्रत घेतले .
नानासाहेब दानीही आहेत . नुसते वित्त देवूनच दानी होत नाही तर वित्त , समय , बुद्धी , शरीर यांचे समर्पण म्हणजे दान . नानांनी कुटुंबासाठी असलेल्या वेळे व्यतिरीक्त आपला वेळ संस्थेच्या कामा साठी देवून समयदान केलेले आहे. कुशाग्र बुध्दी वापरून स्वच्छ प्रशासनाने ४६ शाखांतून २५००० विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन बुद्धीदान केलेले आहे . बहुतेक सर्व शाखांच्या इमारतीचे भव्य दिव्य व प्रशस्त शाळांचे बांधकाम श्रमदानाने करून शरीरदान केलेले आहे कामासाठी देवून समयदान केलेले आहे . विद्यार्थी व शिक्षकवृंदात आध्यात्मिक विचार रुजविण्यासाठी कृतज्ञतेच्या भावाने गीताई शिबिरे घेवून प्रयत्न केलेला आहे .
समाजाने टाकून दिलेल्या , तिरस्कृत केलेल्या , नेत्रहीन अपंग , मतीमंद , गरीब मुलांना शिक्षण देवून त्यांचा आत्मविश्वास वाढविला आहे . ज्ञानदान व ज्ञानसंर्वधनाचे पवित्र कार्य अव्याहतपणे चालू आहे . समाजाच्या तळागाळातील , गरीब , हीनदीन अशा मुलांना प्रेमाची उब देवून जीवन जगण्याचा उत्साह निर्माण करुन नवजीवन प्रदान केलेले आहे . असे कार्य भगवंताला अपेक्षीत आहे .
नानासाहेबांनी आपले उभे आयुष्य सर्वसामान्य विद्यार्थ्यांची उन्नती , विकास करण्यासाठी चंदनासारखे , निरपेक्ष - निस्वार्थ भावाने झिजवून , तन - मन - धनाने कार्य करण्यासाठी वेचलेले आहे . काटकसर हा स्वावलंबी जीवनाचा पाया आधारभूत धरुन संस्थेचे आर्थिक व्यवहार केलेले दिसतात . समाजकल्याण , परोपरकार , सर्व सामान्यांचा उद्धार करीत आहेत . कणभर बोलून मणभर कृती करणारे , दिलेले वचन पाळणारे , सत्यनिष्ठा , तप , त्याग , संयम यांनी आचरण करुन तपस्वी व्यक्तिमत्त्व कर्मयोगी असे नानांचे जीवन सर्वांना स्फुर्तीदायक ठरेल . नानासाहेबांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाचा व उपकाराचा प्रभाव जीवनभर आठवणीत राहील .
आज अशा कर्मयोगी नानासाहेबांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्य करण्यासाठी निरामय स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो अशी भगवंताचे चरणी प्रार्थना करतो .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा