कर्मयोगी श्री.नानासाहेब चव्हाण(अरविंद बळवंत क्षीरसागर,एम.ए., प्रमुख कार्यवाहक साने गुरूजी कथामाला मुंबई जिल्हा समिती)
साने गुरुजींच्या तेजस्वी व प्रभावशाली व्यक्तिमत्वामुळे ध्येयवादी व सेवाभावी तरुणांची एक पिढी त्यांच्याकडे आकर्षित झाली . १ ९ ५० साली साने गुरुजींच्या आकस्मिक निधनामुळे भावविव्हल झालेल्या तरुणांनी गुरुजींच्या स्मृतीने व प्रेरणेने स्वत : ला शैक्षणिक , सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात निरपेक्ष भावनेने झोकून दिले . आमचे नानासाहेब चव्हाण हे या पिढीचे कर्तव्यनिष्ठ आणि कर्तबगार प्रतिनिधी आहेत . हे त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त नमूद करण्यात मला आनंद होत आहे . शिक्षणाचा प्रसार केल्याशिवाय समाजामध्ये जागृती होणार नाही याची नानांना जाणीव होती . आणि याच भावनेतून त्यांनी १ ९ ५३ साली राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ नावाची शिक्षणसंस्था स्थापन केली . आज नानांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या अंतर्गत पाचोरा , भडगाव , चाळीसगाव तालुक्याच्या परिसरांमध्ये अनेक बालवाड्या , प्राथमिक शाळा , माध्यमिक शाळा , कनिष्ठ / वरिष्ठ महाविद्यालये , अंधशाळा , आश्रमशाळा विद्यादानाचे पवित्र कार्य करीत आहेत . आपल्या शाळेतील , महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय प्रवृत्तीची भावना निर्माण व्हावी यासाठी नाना सदैव प्रयत्नशील असतात .
महात्मा गांधी , साने गुरुजी , विनोबाजी ही नानांची आराध्य दैवते आहेत . महात्मा गांधींच्या आदेशानुसार त्यांनी १ ९ ४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला . धुळे शहरामध्ये ब्रिटीश राजवटीचा निषेध करण्यासाठी त्यांनी काढलेल्या विद्यार्थ्यांच्या मिरवणूकीमुळे त्यांना धुळे तुरुंगात २ महिन्यांची कारावासाची शिक्षा झाली . साने गुरुजींच्या विचारांचा परीस स्पर्श नानांना लाभला . साने गुरुजींचे चिरंतन स्मारक असणारया " साने गुरुजी कथामालेच्या स्थापने पासून ते आजतागायत कथामालेच्या सर्वांगीण विकासासाठी नाना प्रयत्नशील असतात . साने गुरुजी कथामालेची अधिवेशने , विविध सांस्कृतिक कार्यक्रम , साने गुरुजींच्या साहित्याचा प्रसार इ . कामात रममाण होण्यात ते स्वत : ला धन्य समजतात . पू . विनोबाजींचा अमृततुल्य सहवास लाभणाचे भाग्य नानांना मिळाले . विनोबाजींचा भूदान यात्रेत नानांनी सहभाग घेतला . विनोबाजींचे शिष्य श्री . गाडे गुरुजींच्या पदयात्रेत , गीताई प्रचार यात्रेत नानांनी मोलाचे सहकार्य दिले . १ ९ ५१ मध्ये पवनार येथे पू . विनोबाजींच्या उपस्थितीत झालेल्या कांचनमुक्ती व कृती शिबिरात नानांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला . विनोबाजींच्या नुकत्याच झालेल्या जन्मशताब्दी वर्षांमध्ये नानांनी ' मैत्री ' मासिकाचे १०० वर्गणीदार केलेत . गीताईच्या १०,००० प्रती संपविल्या . गीता प्रवचनांच्या ५०० प्रती संपविल्या .
नानांनी अनेक संस्था स्थापन केल्या . तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते , शिक्षणप्रेमी मंडळींचा एक संच उभा केला आहे . काही दिवसांपूर्वी नानांनी स्थापन केलेल्या जळगाव येथील महाविद्यालयाचे विनम्र , विद्याव्यासंगी प्रा . राजु निकम यांच्या भेटीचा मुंबईत योग आला . त्यांच्या प्रत्येक शब्दातून आणि कृतीतून नानांविषयी असणारा आदरभाव आणि जिव्हाळा दिसून येत होता . नानांच्या संस्थेतील सर्व अध्यापक आणि प्राध्यापक वर्ग नानांविषयी हाच आदरभाव बाळगून आहेत .
साने गुरुजी कथामालेच्या अनेक कार्यक्रमातून नानांचा आणि माझा संबंध आला . त्यांची साधी राहणी , विनयशील स्वभाव , अध्यात्मिक प्रवृत्ती सदैव कार्यरत राहून इतरांना कार्यप्रवृत्त करण्याची हातोटी ही त्यांच्या जीवनातील कार्यवैशिष्ट्ये आहे . व याची प्रचिती आली . नानांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला अध्यात्माची जोड असल्यामुळे त्यांचे कार्य अधिक प्रभावी ठरत आहे . नानांनी जमविलेला अफाट पैसा लोकसंग्रह हाच त्यांचा बँक बॅलन्सआहे . आणि त्यांच्या लोकप्रियतेची पोच पावती आहे .
श्रीमद् भगवतगीतेत श्रीकृष्णांनी सांगितले आहे , " कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । ' भगवंताच्या वचना प्रमाणे कोणत्याही फळाची , मानपानाची अपेक्षा न करता नानासाहेब एखाद्या कर्म योग्या प्रमाणे मोलाचे सामाजिक , शैक्षणिक कार्य करीत आहेत.
श्री योग वृदांवन धामचे स्वामी अखंडानंदजी स्वामीना आपल्या' जीवन एक योग ' या पुस्तकात म्हटले आहे की , जी व्यक्ती जीवनामध्ये चांगली कर्मे करण्याचा संकल्प करते , चांगले कर्म प्रयत्नपूर्वक करते त्या व्यक्तीची जीवनयात्रा सफल होत असते . माझ्या दृष्टीने सत्कर्माचा , सत्संकल्पाचा सडा शिंपणारया नानांची जीवनयात्रा सफल झाली आहे असे म्हणणे रास्त ठरेल .
साने गुरुजी कथामाला मुंबई जिल्हा समिती , स्व बळवंतराव क्षीरसागर अध्यात्म केंद्रातर्फे नानांना अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! नानांना अभिप्रेत असणारी शिक्षणप्रेमी , संस्कारक्षम , सामाजिक बांधिलकीच्या भावनेने परिपूर्ण असणारी आदर्श समाजव्यवस्था निर्माण करण्याची शक्ती आपल्यामध्ये यावी हीच नानांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त प्रभुचरणी विनम्र प्रार्थना .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा