श्री. यशवंतराव नानांचे नाव कसल्याही कारणाने कुठेही निघाले की राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनेक उपक्रमांचा आलेख डोळ्यापुढे चटदिशी उभा राहतो . सन १ ९ ५० साली ग्रामीण भागातील शेतकरी व कामकरी समाजातील मुलांना उच्च चांगले शिक्षण मिळण्याच्या हेतूने श्री . नानांनी प्रथम मुलांसाठी फक्त एका वसतीगृहाची स्थापना केली . कदाचित त्यावेळेस याच एका मामुली उपक्रमाचा विस्तार आज झालेला आहे . येवढा विस्तार करावयाचा त्यांचे मनामध्ये कल्पनाही नसेल , परंतु चांगल्या माणसाने चालविलेल्या चांगल्या कामाला कुणीही सुज्ञ माणुस सहकार्य करतो या उक्तीप्रमाणे श्री . नानांना त्यांनी सुरु केलेल्या या शैक्षणिक कामास तालुक्यातील त्यावेळच्या सर्वपक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांनी खुप मोठ्या प्रमाणात अगदी मनापासून मोलाची साथ दिली . त्यात कै . रामराव जिभाऊ , कै जे . एस् . आप्पा , कै . मोतीराम भाऊ , कै . राजाराम भाऊ , श्री . सोनूसिंग अण्णा , कै . रामभाऊ देशमुख , कै . भिकनरावदादा , कै महारु हाजी , कै . देवराम भाऊ या व आणखी अशा बऱ्याच कार्यकर्त्यांची नावे घेता येतील . राजकीय विचार काहीही असले तरी श्री.नानांचे संस्थेचे कामासाठी सर्वजण एकत्र येऊन अगदी एक विचाराने कुठलाही निर्णय घेत असत व त्यासाठी प्रयत्न करीत असत . हे मी स्वत : अनुभवलेले आहे . या सर्व भिन्न भिन्न विचाराच्या मंडळींना एकत्रित बसवून त्यांच्याकडून श्री . नानांनी त्यांनी अंगिकारलेले हे पवित्र शिक्षणाचे काम करुन घेण्यासाठी जे कौशल्य दाखविले ते खरोखरच वाखाणण्या जोगेआहे . सामाजिक कार्यकर्ता म्हटला म्हणजे त्याचे काम एकाच संस्थेपुरते मर्यादित राहत नसते . त्यास अनेक संस्थांमधुन असावे अशी इच्छा निर्माण होते . श्री . नाना मात्र याबाबत अपवाद आहेत . मग तो कार्यकर्ता त्याचे इच्छेनुसार प्रत्येक संस्थेत जाण्यासाठी वाटेल त्याच्याशी सलगी करुन कुणाच्याही परिचयाची पर्वा न करता वाटेल त्या मार्गाचा अवलंब करुन प्रयत्न करीत असतो . त्यामुळे त्यास अनेक विरोधक निर्माण होतात व मग त्यास कुठलेही काम हे विरोधक नीट व्यवस्थित करु देत नाहीत व या अशा विरोधामुळे त्यास कुठलेही काम मग ते चांगले जरी असले तरी ते करणे शक्य होऊ शकत नाही . अशी शेकडो उदाहरणे आपण पहातो आहोत . परंतु श्री . नानांनी मात्र एक विशिष्ट ध्येय डोळ्यापुढे ठेऊन ते सर्वार्थाने परिपूर्ण करण्याकरीता शिक्षणप्रसाराचे कामाव्यतिरीक्त कुठल्याही इतर बाबींकडे दुरान्वयाने देखील लक्ष दिले नाही . त्यामुळेच त्यांना या शिक्षणसंस्थेचा एवढा मोठा पसारा वाढविणे शक्य होऊ शकले . त्यांना अनेकवेळा काही हितसंबंधी मंडळींनी त्यांच्या स्वत : च्या काही मनोकामना पूर्ण करुन घेण्यासाठी केवळ त्यांचा वापर करुन घेण्याच्या दृष्टीने इतर संस्थांमध्ये त्यांनी लक्ष घालावे असा अनेक वेळा आग्रह देखील करुन पाहिला . परंतु श्री . नानांना त्या बाबत कधीच अभिलाषा झाली नाही व त्यांच्या त्या आग्रहाला ते बळीही पडले नाहीत आणि म्हणूनच त्यांना या एकाच संस्थेचे काम त्यांच्या कल्पनेप्रमाणे अगदीच व्यवस्थित करता येऊन त्यायोगे आज कितीतरी ग्रामीण व शहरी विभागातील मुलामुलींना त्याचे इच्छेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण मिळू शकत आहे .
श्री . नानांचे स्वभावात काही दोष जरुर आहेत . बऱ्याच मंडळींचे त्यांचेशी काही प्रश्नांवरुन मतभेद होत असतात . परंतु संस्था व त्या संस्थेच्या विकासासाठी श्री . नाना करीत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नामुळे त्या मंडळींना देखील ते मतभेद विसरावे लागतात . एखाद्या प्रश्नांवरुन मतभेद झाला म्हणून त्याचा परिणाम एकंदरीत संस्थेच्या विकासाच्या आड येऊ न देणे हे खऱ्या कार्यकर्त्याचे प्रमुख लक्षण असते आणि अगदी तशाच विचाराची तालुक्यात बरीचशी कार्यकर्तेमंडळी असल्याने या संस्थेचा सर्वांगीन विकास होऊ शकलेला आहे . संस्थेच्या कामासाठी श्री . नानांचा मोठा अट्टाहास असतो . समोरच्या माणसास हो म्हणावेच लागतेे व काम करुन द्यावेच लागते . काही वेळेस शारीरिक क्लेश देखील संस्थेच्या कामासाठी श्री . नानांनी घेतलेले आहेत आणि म्हणून त्यांचे संबंधाने एक वेगळी आदराची भावना समजदार माणसाचे मनात निर्माण झालेली आहे . व नानां विना राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसार मंडळ ही कल्पनाही चांगल्या विचारी माणसाचे मनाला रुचत नाही व रुचणार नाही म्हणून काही स्वार्थी विचारांनी का होईना परंतु नानां परमेश्वराने चांगले आरोग्याचे दीर्घआयुष्य द्यावे हीच प्रार्थना .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा