ति . स्व . नाना आणि ति . सौ . ताई यांची आठवण मला भूतकाळात घेऊन जाते . १ ९ ६१ चा जून महिना , माझ्या वडिलांसोबत मी दुपारी ति , नानांच्याकडे प्रथम गेले . घरात शिरल्याबरोबर बाहेरच्या रखरखीत उन्हाचा विसर पडला . सौम्य स्मित करीत अतिशय आपुलकीनं आमचं स्वागत करणारे नाना , सौ . ताई आणि घरातलं साधं , स्वच्छ व शितल वातावरण नकळत मनाच्या कप्प्यात स्थान पटकावून बसलं . मी कॉलेज शिक्षणासाठी चाळीसगावच्या कन्या छात्रालयात प्रवेश घेतला . माझ्यासारख्या साध्या शाळामास्तरांच्या मुलीला त्या काळात स्वतंत्र खोली घेऊन राहणं परवडणार नव्हतं . पण नानांच्या , होय वि नानांच्याच , कारण सौ . ताई आणि ती . नाना हे छात्रालयातील सर्व विद्यार्थिनींचे आईवडिलच होते . छात्रालयानं मला सामावून घेतलं , मदतीचा हात दिला , स्वावलंबन शिकवलं , सहजीवन शिकवलं , माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवायला अप्रत्यक्षपणं मदत केली , प्रोत्साहन दिलं , संरक्षण दिलं आणि आश्वासन केलं . छात्रालयात प्रवेश घेणाऱ्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीय गरीब विद्यार्थिनी गहू , ज्वारी , बाजरी , डाळी व वरखर्चाचे पैसे बऱ्याचदा वेळेवर देऊ शकत नव्हत्या . पण आमची रोजी रोटी त्यांनी कधी अडू दिली नाही . त्यामुळं मुलीचं शिक्षण विनाअडचण चालू राहिलं . विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांच्या छात्रालयांचं हे वेळ , श्रम मागणारं आणि चिंता वहायला लावणारं काम व्रतासारखं अनेक वर्षे या पतिपत्नींनी नेम म्हणून केलं . आज न माझं वय वाढल्यावर त्यांचं श्रेष्ठत्व मनाला अधिकच भिडतं .
या कालखंडात हळूहळू राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ , त्याचे पदाधिकारी , ति . नानांची शिक्षणाबद्दलची आस्था , विद्यार्थ्यांबद्दल कळकळ , त्यादृष्टीने अथक परिश्रम करण्याची वृत्ती या सर्वांचा जवळून परिचय झाला . ति . नानांचं वैशिष्ट्य म्हणजे योग्य कामासाठी योग्य व्यक्ती हेरण्याची त्यांची हातोटी . त्या काळात राष्ट्रीय विद्यालय , राष्ट्रीय कन्याशाळा , कन्याछात्रालय या सर्वांच्या प्रगतीसाठी त्यांनी तरूण , तडफदार व शैक्षणिक कार्याविषयी आवड असणाऱ्या श्री . गु . स . परदेशींसारख्या अनेक शिक्षकांना हेरून आपल्या संस्थेत आणलं होतं . त्यामुळं शाळांना प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करणं कठिण गेलं नाही . आपल्या संसाराचा भार आपल्या सुविद्य , विचारी कर्तबगार , मायाळू परंतु करारी पत्नीवर , सौ . ताईवर सोपवून ति . नाना सर्वस्व झोकून राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी सतत धडपडत राहिले आणि आजही त्यांचं हे कार्य चालूच आहे . चांगलं कार्य जराही न कंटाळता , न थांबता सातत्यानं करणं हे असिधारा व्रत ति . नानांसारख्या एखाद्याच कर्मयोग्याला पूर्णत्वाला नेता येतं .
माझ्या पुढच्या शिक्षणासाठी मी जळगावी आले . १ ९ ६५ च्या मे मध्ये माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून चाळीसगावी ति . नानांना भेटले . या सुमारास राष्ट्रीय विद्यालयात इंग्रजी माध्यम शाळा सुरू करावयाची असल्याने माझ्या वडिलांनी या संस्थेत यावे अशी ति . नानांची तीव्र इच्छा होती . त्यानुसार माझे वडिल नगरदेवळा सोडून राष्ट्रीय विद्यालयात आले . त्याच वर्षी मी B.Sc. परीक्षेस बसले होते . माझीही लेखी आणि तोंडी मुलाखत होऊन मी राष्ट्रीय कन्याशाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाले . यावेळी संस्थेचे सेक्रेटरी म्हणून ति . नानांची एक वेगळी बाजू मला बघायला मिळाली . बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या व्यक्तीस मुलाखतीस बोलावतांना तिला इंग्रजी भाषेचं कामापुरतंतरी ज्ञान असलंच पाहिजे असा ति . नानांचा आग्रह मला लेखी मुलाखतीतून प्रत्ययास आला . ति.नाना व मंडळातील इतर सन्माननीय यांनी संस्थेत अनेक चांगले पायंडे पाडले . त्यातला मला भावलेला एक म्हणजे एस् एस् सी . निकालानंतर प्रत्येक शाळेच्या ११ वीस शिकविणाऱ्या शिक्षकांकडून त्यांच्या विषयात अत्तीर्ण - अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची माहिती मागवणं अन् निकाल चांगला / वाईट ज्याप्रमाणे असेल त्यानुसार मंडळाने शिक्षकास शाबासकी देणं किंवा कर्तव्यात कसूर केल्याची जाणीव देणं , यामुळं झालं काय की आपल्या विषयाचा निकाल चांगला लागावा यासाठी शिक्षकांमध्ये अहमिका लागली ज्यामुळं शाळांचे निकाल उंचावू लागले . माझ्यातला चांगला शिक्षकति . नानांच्या हाताखाली राष्ट्रीय कन्याशाळेत घडू लागला .
माझ्या वडिलांच्या अकाली मृत्युच्यावेळी आमच्या सर्व कुटुंबाच्या ति . नाना व सौ . ताई यांनी दिलेला आधार , सांत्वन व सर्व प्रकारची मदत हा त्यांच्या ठायी असलेल्या सामाजिक जाणीवेचा परिपाक आहे . त्याबद्दल आम्हा कुटुबियांना त्यांच्या ऋणात रहायला आवडेल . आमच्यासारख्या अनेक कुटुंबांना त्यांनी सर्व प्रकारचा आधार दिलेला मला माहीत आहे . ति . नानांचं आणि सौ . ताईच घर ही आमची शिक्षक म्हणून व व्यक्ती म्हणून अडचणी सांगायची हक्काची जागा होती अन आहे .
ति . नानांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत . त्यांनी समाजातील अनेक अंगांना स्पर्श करून आपलं स्वत : च व्यक्तिमत्त्व तर संपन्न बनविलं आहेच . परंतु त्यांच्या नेतृत्वानं , सहभागानं अनेक उपक्रमांचं सोनं झालं आहे . माझ्या दृष्टीनं ति . नानांमधला माणूस जागा आहे , जिवंत आहे , संवेदनशील आहे . म्हणूनच ति . नाना आम्हाला वडिलांच्या जागी आहेत . ति , नाना , सौ . ताई आणि त्यांचा गोकुळासारखा संसार असाच फुललेला राहो , ति , नाना तुम्हाला शि.सा.नमस्कार , जिवेत शरदः शतम् !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा