खानदेशात साने गुरूजींच्या संस्काराने प्रभारित होऊन स्वत : ला समाजसेवेत झोकून देणाऱ्या ज्या काही अत्यंत थोडया कर्तृत्व संपन्न व्यक्ती आहेत , त्यात चाळीसगांवच्या श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाणांचा क्रम फारच वरचा लागतो . सध्या शिक्षणक्षेत्र म्हणजे पैसे कमविण्याचा धंदा झालाय . शिक्षणाचा कुठलाही संस्कार नसलेली माणसं या क्षेत्रात येतात . आणि सत्ताप्राप्तीसाठी किंवा टिकवण्यासाठी शिक्षणसंस्थाचा एक साधन म्हणून उपयोग करतात . नानासाहेब या गोष्टीचा एक सन्माननीय अपवाद आहेत .
शिक्षण म्हणजे सततचा संस्कार . या प्रक्रियेत संस्काराचे देणे आणि घेणे निरंतर चालू असते . अत्यंत कष्टपूर्वक शिक्षण घेतलेल्या नानासाहेबांनी ही संस्काराची संपन्नता स्वप्रयत्नांनी तर मिळवलीच पण अनंत हस्ताने ती इतरांनाही दिली .
शाळा माणूस घडविण्याचे कार्यालयअसते . या कार्यालयात येवून बसणाऱ्या आणि शिक्षण घेण्याऱ्या मुलांमुळे समाजाचे भवितव्य जसे घडते तसेच शाळेबाहेर प्रचंड संख्येने विखुरलेल्या अशिक्षित मुलांमुळेही घडते . नानासाहेबांनी शाळेत येणाऱ्या मुलांची जितकी काळजी वाहिली तितकीच , किंबहुना त्यापेक्षा अधिक काळजी शिक्षण घेवू न शकणाऱ्या मुलामुलींची वाहिली .
हक्क मागणाऱ्या पण कर्तव्यात कसुर करणाऱ्या चतुर सभ्य समाजापेक्षा दुसऱ्यांवर निरलसप्रेम करणारा , उदार आणि क्षमाशील असलेला माणूस अधिक महत्वाचा असतो . समाजाची एकात्म बांधणी अशा माणसांमुळे होते . विनोबांच्या सहवासात राहिलेल्या नानासाहेबांनी दुस - यांवर निरलस स्नेह करणारी ही माणसं घडविण्यासाठी योजनाबध्द प्रयत्न केले . त्याची सुरवात त्यांनी स्वतःपासूनच केली . राष्ट्रीय चळवळीत असल्यामुळे ते संधी असूनही इंग्रजी शाळेत गेले नाहीत . स्वतः शेतात रात्रंदिवस राबून शेतकी शाळेत शिक्षण घेतले . पुढे त्यांनी जो प्रचंड शैक्षणिक परिसर निर्माण केला त्याच्या मुळाशी राष्ट्राविषयीचे हे जागते भान सतत दिसते.
नानासाहेब त्या पिढीत जन्माला आले होते ज्या पिढीने देश स्वतंत्र व्हावा यासाठी जिद्दीने अपरंपार प्रयत्न केले . या प्रयत्नांमधे यश मिळाल्याबरोबर एकानि त्या पिढीला कृतकृत्य वाटणे स्वाभाविक होते . स्वातंत्र्य संगरात भाग घेतलेल्या अनेकांना ज्या दिवशी देश स्वतंत्र झाला त्या दिवशी आपल्या आयुष्याची सार्थकता झाली असे वाटले आणि तसे वाटण्यात काही गैरही नव्हते . पण मुठभर माणसे अशी अवश्य होती ज्यांना या स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त करुन दिला पाहिजे याचे भान होते . या अनुभवी कार्यकत्यांनी " भविष्यातला भारत ' कसा असावा या विषयी ही चिंतन केले होते . काकासाहेब कालेलकरांनी भारताला तीन त - हेच्या क्रांतीची आवश्यकता कशी आहे , याचे फार मार्मिक वर्णन एके ठिकाणी केले आहे . या समाजाला मानस - परिवर्तन , जीवन - परिवर्तन आणि समाज - परिवर्तन या तिन्ही दिशांनी होणारया क्रांतीची आवश्यकता असल्याने त्यांनी प्रतिपादीत केले.
नानासाहेबांनी शेती आणि शिक्षण ही दोन मुख्य कार्यक्षेत्रे निवडताना या तिन्ही क्रांतीची तत्वज्ञाने लक्षात ठेवली असावीत , बंगालच्या काही साहित्यकारांनी Culture साठी कृष्टि ' या शब्दाचा उपयोग केला होता . ' कृष्टि कृषि ' चा पर्याय आहे . संस्कृतिच्या मुळात कृषिच आहे , यावर विश्वास ठेवणारे लोक श्रमाची प्रतिष्ठा जपतही असतात व वाढवतही असतात , नानासाहेबांच्या सर्व उपक्रमाच्या मागे हे श्रम - प्रतिष्ठेचे अवधान आहे . शेतीचे आधुनिक तंत्र कळावे यासाठी त्यांनी शेतकी शाळेत प्रवेश घेतला होता , त्यातल्या परीक्षांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला . इतर अनेकांप्रमाणे सामाजिक कार्य हा त्यांचा प्रथम उद्योग नव्हता . प्रथम उद्योग होता शेतीत राबणे , कष्ट करणे , त्यातून त्यांनी सामाजिक कार्याची उभारणी केली . नानासाहेब हाडाचे शिक्षक आहेत , त्यांच्यातला हा शिक्षक जीवनातल्या सर्व क्षेत्रात प्राधान्याने उभा असतो . ते एखादे वसतीगृह उभारीत , शाळा काढीत किंवा महाविद्यालयाची बांधणी करीत , सर्वत्र त्यांच्यातल्या शिक्षकाची दृष्टी ' महत्वाची ठरते . ही दृष्टी त्यांना सानेगुरुजींच्या आणि विनोबांच्या जीवनकार्यातून लाभली . गुरूजींचे सारे वाड़मय आणि कर्म जीवनाची उदात्तता पटविणारे तर होतेच पण जीवनाला समर्थता देणारेही होते . जगण्याचे सामर्थ्य आणि प्रयोजन देणारी माणसे थोडीच असतात . नानासाहेबांनी जीवनाचे प्रयोजन देण्याची वाट चोखाळली . त्यामुळेच ते आपल्या काळातले सर्वात अधिक विद्यार्थीप्रिय शिक्षक ठरले . त्यांचे शिकवणे केवळ पुस्तकातले नव्हते . ते प्रत्यक्ष जीवनस्पर्शी होते .
आज त्यांच्या वेगवेगळया लहानमोठया ४६ ज्ञान शाखांमधून हजारो विद्यार्थ्यांना जे ज्ञान मिळत आहे , ते प्रत्यक्षत : जीवनाला लावता यावे यासाठी त्यांची निरंतर धडपड चाललेली असते . " शिक्षक म्हणजेच संस्कृति ' हे सूत्र खरे आहे पण गहन आहे . संस्कृति म्हणजे पुनरावृत्ती नव्हे. काळाबरोबर ज्यातली सृजनशीलता आणि पुनर्निर्माण क्षमता वाढत जाते व असे वर्धिष्णू होतांना जी आपल्यातली चिरंतन तत्वे टिकवून धरते ती संस्कृति होय , शिक्षक अशा संस्कृतिचा प्रतिनिधीही असतो व उपासकही असतो .
आज विलक्षण वेगाने बदलणाऱ्या काळाशी संवाद साधू शकेल , त्याची गति पकडू शकेल असे शिक्षण हवे . ते देणारे शिक्षक हा तशाच तोलामोलाचे किंवा कुवतीचे लागतात . आजच्या काळातल्या शिक्षकाला प्रत्येक क्षणी नवे ज्ञान मिळवावे लागते आणि आपल्या अनुभवाच्या मुठीतून विद्यार्थ्यांपर्यंत ते त्वरित पोहचवावे ही लागते . अश्या स्थितीत , ' शिकणे ' हे कधीच संपत नाही हे लक्षात घ्यायला हवे . ' थांबला तो संपला ' हा गतिचा कायदा येथेही लागू पडतो . नानासाहेबांसारख्या अनुभवी आणि दृष्टिसंपन्न कार्यकर्त्याला हे कळत नसेल असे मुळीच नाही . ते आपल्या शाळा - कॉलेजांमध्ये जे विविध उपक्रम राबवतात त्या उपक्रमांची दिशा सृजनशीलता आणि ज्ञानसंपन्नतेच्या वाटेने जाणारीच आहे . हा प्रश्न फार अलाहिदा आहे की किती शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचा हा दृष्टिकोन पोहचतो आणि किती या मार्गाचे प्रवासी बनतात ?
स्वराज्याचे पहिले साधन म्हणून लोकमान्य टिळकांनी ' राष्ट्रीय शिक्षणा ' चा वापर केला . या शिक्षणाच्या माध्यमातून स्वत्वाची जाण , हक्काची जाणीव आणि राष्ट्राची समृध्द परंपरा जाणणारी व तिच्या संरक्षणासाठी निर्धाराने उभी राहणारी पिढी त्यांनी उभी केली . खुद्द नानासाहेबांवर त्याच राष्ट्रीय शिक्षणाचे संस्कार आहेत .
आता हेच राष्ट्रीय शिक्षण स्वराज्याचे सुराज्य करण्याचे एकमेव साधन म्हणून वापरले जायला हवे . शिक्षणाला हा संदर्भ लाभावा यासाठी सतत झटणाऱ्या श्रेष्ठ शिक्षण तज्ञापैकी नानासाहेब एक आहेत .
आज आयुष्यातल्या ७५ व्या वर्षी आपण लावलेल्या छोटयाशा रोपटयाचा महाकाय वृक्ष झाल्याचे पाहाण्याचे भाग्य त्यांना लाभत आहे . त्यांनी सजवलेली मूल्ये जगतील , वाढतील , शतवर्षानंतर या मूल्यांनी भारलेली एक देशप्रिय , एकात्म समाज पाहाण्याचे भाग्य त्यांना लाभावे ही सदिच्छा .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा