मी . राष्ट्रीय वसतिगृहाचा विद्यार्थी . आज २७ वर्षापूर्वीची विद्यार्थी दशेतील आठवण झाली . सकाळचे ५ वाजले होते . घंटा झाली , वसतिगृहाच्या प्रांगणात प्रार्थनेसाठी मुले एकत्र जमली . प्रार्थनेला सुरूवात झाली .
स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे ।
कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा ।।
प्रार्थनासंपली . नानासाहेबांनी प्रार्थनेचा अर्थ आपल्या रसाळ वाणीने साध्या , सोप्या आणि सरळ भाषेत सांगितला . ही प्रार्थना रोज म्हणत असल्यामुळे मुखपाठ झाली . आजही ही प्रार्थना मी रोज म्हणतो . नानासाहेबांमुळे गीताईचा संस्कार झाला .
सामाजिक कार्याची आवड , ध्येयनिष्ठा आणि त्याग या सद्गुणांचे बाळकडू त्यांना आई वडिल आणि थोर गांधीवादी नेते कै . हरीभाऊ चव्हाण यांच्याकडून मिळाले . आईची जात्यावरची घरघर आणि वडिलांचा टाळांचा निनाद मनाला स्फुरण देतो . घरातील धार्मिक वातावरणामुळे अभंग आणि ज्ञानेश्वरीचे सतत वाचन चाले , त्यामुळे त्यांना अध्यात्माची गोडी लागली .
नानासाहेब अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे . फायनलच्या परीक्षेचे जळगाव हे केंद्र होते . १५०० विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी तृतीय क्रमांक पटकावला . महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीमुळे त्यांनी शेतकीशिक्षण घेतले . माध्यमिक शिक्षण घेत असतांना धुळयाच्या शेतकी शाळेतील विद्यार्थ्यांकडून भोजनाची विनामुल्य सवलत मिळाली . विद्यार्थ्यांचे ते आदरस्थान होते . त्यांना विद्यार्थी ' बापू ' म्हणत . कारण नानासाहेबांच्या प्रत्येक कृतीला विचारांची जोड होती . परिस्थितीशी झुंज देत नानासाहेब बी.ए.एल.एल.बी झाले. ते नामवंत वकील झाले असते . ऐष आरामात राहिले असते . पण हा मार्ग त्यांनी स्वीकारला नाही . आपण मानवसमाजाचे देणे लागतो . गोर - गरीब जनतेसाठी , खेडयातील अशिक्षितांसाठी आणि स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी शिक्षणप्रसाराचे व्रत घेतले .
आ.बं. हायस्कूलमध्ये शिक्षक असतांना नानासाहेब गणित शिकवत , ते गणित शिकवतांना इतके तल्लीन होत की त्यामुळे विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळत . विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी नावलौकिक कमविला . पायी सहली काढण्याची प्रथा त्यांनी सुरू केली होती . विद्यार्थ्यांची निसर्गाशी ओळख व्हावी , त्यांनी झऱ्याचे गाणे ऐकावे , फुलाफळांचा गंध घ्यावा , सृष्टीच्या काव्याचा आस्वाद घ्यावा हा त्यांचा दृष्टिकोन होता . राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाखांचा विस्तार करीत असतांना त्याकाळी एस.टी. ची सुविधा सर्वत्र नव्हती . पावसाळयात एस.टी. जात नसे . त्यामुळे त्यांना पायी प्रवास करावा लागे . सानेगुरूजींची ' श्यामची आई ' आणि ' पत्री ' यांच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मंगल वाड : मय प्रसारासाठी त्यांनी पदयात्रा केलेली आहे .
बालमनावर खोलवर संस्कार होण्यासाठी त्यांनी सानेगुरूजींचे ओजस्वी वाड् : मय विद्यार्थ्यांना दिले .
' करी मनोरंजन जो मुलांचे , जडेल नाते प्रभुशी तयाचे । ' हे ब्रीद असलेल्या अखिल भारतील सानेगुरूजी कथामालेचे नानासाहेब कार्यकारिणी सदस्य होते . या संस्थेचे ते कोषाध्यक्ष म्हणून आजतागायत काम पहात आहेत .
बालपणी मराठी शाळेच्या सुंदर बागेमुळे वृक्ष - वेलींविषयी आवड निर्माण झाली . सर्व शाखांवर त्यांनी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले . केवळ वृक्षारोपणच केले असे नाही तर वृक्षाला लहान मुलासारखे वाढविले . खऱ्या अर्थाने वृक्षसंवर्धन केले . यासाठी भावजागरण दिंडी - आयोजित केली होती . ही दिंडी अगदी वारकरी दिंडीसारखी होती हातात टाळ घेऊन ' ज्ञानोबा - तुकाराम ' ' मुक्ताई जनाई ' म्हणत ही वृक्षदिंडी फिरली . आजही झाड शीतल छाया देत आहेत . पर्यावरण संतुलनास मदत करीत आहेत .
नानासाहेबांजवळ दूरदृष्टी आहे . श्रमदानाने हिरापूर रोडला तांत्रिक शिक्षणासाठी वास्तु उभी केली . ही जागा अक्षरश : एक माळरान होते , एक नाला तेथे वहात होता . या जागेवर मला सर्कस पाहिल्याचे आठवते . आज या ओसाड माळरानावर नंदनवन फुलले आहे . ही जागा सपाट करण्यासाठी दर रविवारी संस्थेच्या शाखांवरील विद्यार्थी आणि शिक्षक येत . नानासाहेबांबरोबर श्रमदान करीत .
तांत्रिक शिक्षणासाठी १२ लेथ मशिन्स , सर्व साधनसामुग्रींनी उपलब्ध करून दिली . महाराष्ट्रात दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नाव झाले . मोठया प्रमाणावर इंजिनियर , तंत्रज्ञ या परिसरात तयार झाले . ते सर्व श्रेय राष्ट्रीय विद्यालय या शाळेला आणि पर्यायाने " आदरणीय नानासाहेबांना देतात .
१ ९ ८६ साली पुणे विद्यापीठाने बी.सी.एस. म्हणून अभ्यासक्रम केला आणि राष्ट्रीय महाविद्यालयाच्या संगणक विभागाला हा अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली . नानासाहेबांनी भलातधीत ससज अशी पयोगशाळा तयार करून दिली . ज्या स्थानिक चौकशी समितींनी या विभागास भेट दिली त्यांनी या विभागाची प्रशंसा केली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कायम संलग्रीकरण समितीचे अध्यक्ष श्री . अँड.नानासाहेब झेड.बी. पाटील यांनी देखील अतिशय समाधान व्यक्त केले .
नेत्रांना भुरळ घालणाऱ्या सुंदरपुष्पहारातील सुगंध दरवळणारी मोहक आणि रंगीत फुले यांनीच मनुष्य आकृष्ट होतो , त्याचेच कौतुक होते . तथापि ज्या दोरीच्या सहाय्याने ही फुल गुंफली जातात त्या दोरीचे महत्व काही कमी नाही . नानासाहेबांचे विविध क्षेत्रातील नेत्रदीपक यशाने नटलेले जीवन घडविण्यात नानासाहेबांच्या सुविद्द पत्नी सौ . सुशीलाताईचा वाटा फार मोठा आहे . नानासाहेबांचा आणि त्यांचा सुखी संसार पाहिल्यावर त्याची प्रचीती येते .
नानासाहेबांच्या कार्याचा गौरव म्हणून २५ डिसेंबर १ ९ ८८ रोजी मराठी विज्ञान परिषद चाळीसगाव विभागातर्फे २३ वे अखिल भारतील मराठी विज्ञान संमेलनात संमेलनाध्यक्ष होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबईचे संचालक श्री . वि गो . कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र , शाल आणि श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले .
नानासाहेबांच्या या विशाल कार्याबद्दल नाशिक येथील सारडा प्रतिष्ठानने यावर्षीचा ' नंदिनी पुरस्कार ' रू . २५,००० / - जाहीर केला .
अखिल भारतीय सानेगुरूजी कथामाला संघाने यावर्षाचा ' बालसेवा ' पुरस्कार रू . २५,००० / - राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळास जाहीर केला . या दोन्ही पुरस्कारांमुळे नानासाहेबांच्या किर्तीचा सुगंध सर्वत्र दिशांमध्ये दरवळतो आहे . सर्व शिक्षक , विद्यार्थी , जनतेचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे .
नानासाहेबांचा अमृतमहोत्सव हा तमाम जनता जनार्दनाचा आनंदोत्सव आहे . शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मी आपला ऋणी आहे . मी आपल्याला दीर्घ आयुष्य चिंतीतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा