अबोल परंतु कर्तबगार व्यक्तीमत्व(श्री.द्वारकानाथ लेले संयुक्त कार्यवाह,साने गुरूजी कथामाला,पत्रकार नगर,पुणे-16)
वेश असावा बावळा , परि अंतरी नाना कळा , अशी मराठीत एक म्हण आहे . त्यात थोडा बदल करुन ' वेश असावा साधासुधा , परि अंतरी नाना कळा ' अशी म्हण श्री . नाना चव्हाण यांच्या बाबतीत पूर्णपणे लागु पडते . नाना म्हणजे मूर्तीमंत सौजन्यमूर्ती , अंगात खादीची गांधी टोपी , शर्ट आणि धोतर तेही अगदी स्वच्छ . बोलणे गरजेपुरते . ज्याला नानांची कर्तबगारी माहिती नाही त्यांचा नानांविषयी प्रथमदर्शनी गैरसमजच होईल . एक अगदी सामान्य माणूस असेच त्याला वाटेल . पण नानांची कर्तबगारी समजल्यावर तो निश्चित नतमस्तक होईल . मी . स्वत : साने गुरुजींना प्रत्यक्षात पाहिले नाही . परंतु त्यांची छायाचित्रे पाहीली , खूप वाचले , ऐकले . त्यावरुन मलातरी साने गुरुजी आणि नाना चव्हाण यांच्यात कमालीचे साम्य वाटते . श्री.नाना चव्हाण यांचा जीवनपट थक्क करणारा आहे . अगदी प्रतिकुल परिस्थितीतही केवळ जिद्दीच्या जोरावर नानांनी केवढेतरी मोठे यश प्राप्त केले आहे . पण नानांचा मोठेपणा असा की याचा लवलेशही त्यांच्या वागण्या बोलण्यात दिसत नाही . नानांनी जे रोपटे लावले त्याचा आज महावृक्ष झाला आहे . म्हणजे एका दृष्टीने नानांचे एक शैक्षणिक साम्राज्यच आहे . पण नाना सम्राट म्हणून वागत नाहीत . हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे . आजकाल महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशी शैक्षणिक साम्राज्य उभी राह्यली आहेत आणि त्याचा फायदा घेऊन अनेकजणांनी राजकीय पदे प्राप्त केली आहेत . पण नानांनी हे केले नाही म्हणून ते मोठे . नानांचा जीवनपट पाहीला तर एक गोष्ट प्रकर्षान दिसते की नाना कधीही सत्तेच्या किंवा संपत्तीच्या मागे लागले नाहीत . तर त्यांनी सदैव सामाजिक / विधायक कार्याचीच कास धरली . श्री . नाना चव्हाण यांचा डोळ्यात भरणारा मोठा गुण म्हणजे मितभाषीपणा . मी आजवर अनेकदा नानांना भेटलो . पण नाना चकाट्या पिटतायेत असे कधीच दिसले नाही . ते आवश्यक तेवढच आणि तेही मोजक्या शब्दात बोलणार . श्री . नाना स्वत : शिक्षक होते . त्यांनी गेली ४३ वर्षे चाळीसगावची राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था यशस्वीपणे चालवली . अनेक सहकाऱ्यांकडून मोठमोठी कामे करुन घेतली . हे सर्व नानांना कमी बोलून कसे करता आले याचे मला आश्चर्य वाटते . वास्तविक एवढा पसारा सांभाळताना अनेकदा संघर्षाचे , वादावादीचे प्रसंग नक्की आले असणार . अशा स्थितीत मितभाषी नानांनी या प्रसंगावर कशी मात केली असेल याचे मलातरी गुढ आहे . नानांनी स्वत : अनेक विधायक उपक्रम केले . ते संस्थेतही आणले . इतरांना केवळ आदेश न देता स्वत : कृती करण्याच्या नानांच्या वागण्यातून त्यांनी संघर्षाचे प्रसंग टाळले असावेत , इतरांना कार्यप्रवृत्त केले असावे असे वाटते . श्री . नाना चव्हाण यांचा आणि माझा संबंध आला तो साने गुरुजी कथामालेच्या कार्यातून . त्यांच्या समवेत कार्यकारिणीच्या सभा , वार्षिक अधिवेशने , कथाकथन , प्रशिक्षण शिबिरे आणि भूकंपग्रस्त भागातील भाव जागरण दिंडी अशा विविध प्रसंगी नानांचा सहवास लाभला . या प्रत्येकवेळी त्यांचे अस्तित्व म्हणजे अतिशय शांतपणे स्वत : जळत इतरांना प्रकाश देणाऱ्या नंदादीपाप्रमाणे असायचे . ते कोणत्याही वादात भाग तर घेत नसतच . उलट वाद टाळण्याचा प्रयत्न करायचे . श्री.नाना चव्हाण यांची राहणी अतिशय साधी आहे . मित आहार व स्वावलंबन यामुळे आज पंचाहत्तरीतही त्यांची प्रकृती कार्यक्षम आहे . अशीच प्रकृती व दीर्घायुष्य त्यांना लाभो आणि त्यांच्याकडून खूप सामाजिक कार्य होवो ही सदिच्छा .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा