मुख्य सामग्रीवर वगळा

श्री. नानासाहेब य.ना. चव्हाण ,(जीवन व कार्यपरिचय)


 आज देशात एक प्रकारची अस्थिरता दृश्यमान होत आहे. राजकीय व सामाजिक जीवनात प्रचंड उलथापालथ होत असल्याने देशाचे भवितव्य अंधकाराच्या गर्तेत सापडल्यासारखे दिसत आहे. अशा परिस्थितीतही सामाजिक बांधिलकीने, वैचारिक निष्ठेने व अथक कर्तृत्वाने ,परिश्रमाने पाय रोवून खंबीरपणे कार्यरत असलेले अनेक थोर पुरुष आढळतात.आशांमध्ये चाळीसगावचे श्री. यशवंत नारायणराव  उर्फ नानासाहेब चव्हाण यांचा गौरवाने उल्लेख करावा लागेल.
 वयाच्या पंचात्तरीतही युवकांना लाजवेल असे काम ते जिद्दीने व नीरपेक्ष भावनेने करीत आहेत.गेली पन्नास वर्षे जळगाव जिल्ह्यात विशेषता चाळीसगाव, भडगाव ,पाचोरा या तालुक्यातून विद्यालये ,महाविद्यालये, आश्रमशाळा ,अंधशाळा इत्यादी समाजाभिमुख उपक्रमांद्वारे ज्ञानप्रसार करणारी  'राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमीटेड चाळीसगाव' ही संस्था नानासाहेबांच्या कर्तृत्वाचे साक्षात प्रतीक होय.
        कुठल्याही सत्ता लोभाला ,प्रसिद्धीचा हव्यासाला व वैयक्तिक लोभाला वश न होता नंदादीपाप्रमाणे शांतपणे तेवत राहणे हे नानानसाहेबांचे स्वभाव वैशिॆष्टयच होय.  या स्वभावा मुळे  मोठा मित्र परिवार, विस्तृत कार्यकर्त्यांवर्ग त्यांना लाभला आहे.इतकेच नव्हे तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रेम ,सहानुभूती व आदर त्यांना सतत प्राप्त होत आहे.या संस्थेतून निर्माण झालेल्या व आज समाजात विविध उच्च पदावर विराजमान असलेल्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये जी सामाजिक बांधिलकीची  जाणीव आढळून येत आहे,तिचे श्रेय नानासाहेबांना द्यावे लागेल .आज शिक्षण संस्थेला लाभलेल्या कार्यकर्त्यांकडे पाहिले म्हणजे 'महाराष्ट्र हे मधमाशांचे मोहोळ आहे'हे गांधीजींचे उद्गार सार्थ झाल्यासारखे वाटतात. महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष श्री  मधुकररावजी चौधरी, सानेगुरुजी कथामालेचे संस्था पक्षी प्रकाशभाई मोहाडीकर ,सुप्रसिद्ध साहित्यिक  व साने गुरूजी कथामालेच्या अध्यक्ष श्री यदुनाथजी थत्ते प्रभूत्तीं सारखी ज्येष्ठ मंडळी नानासाहेबांचा मुक्त कंठाने गौरव करतांना आढळतात.साने गुरूजींच्या शब्दात सांगायचे झाले तर-
                   "कर्मामध्ये दिव्यानंद
                      सेवेमध्ये दिव्यानंद
                      नाही अन्य फळाचा छंद
                        नाही काही जरूर-
                        आम्ही देवाचे मजूर........."
 हे जणू नानासाहेबांच्या जीवनाचे घोषवाक्यच बनले आहे.अर्थात हे यश नानासाहेबांना सहजासहजी लाभलेले नव्हे!तर त्यामागे त्यांच्या वडिलांची शिकवण ,गुरुजनांचे व वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन, त्यांची स्वतःची कठोर तपस्या कारणीभूत आहे.ही गोष्ट निर्विवाद होय.
      दिनांक 7-1-1923 रोजी रांजणगाव, (तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव )येथे जन्मलेल्या नानासाहेबांनी लहानपणापासून जणू गरिबीचा वसाच घेतला होता.त्यांचे वडील नारायणराव हणमंतराव चव्हाण व्यवसायाने शेतकरी होते. त्या काळात पावसाच्या कृपेवर चरितार्थ चालविणाऱ्या शेतकऱ्याला धक्के खाण्याचे ,ओढगस्तीचे प्रसंग वारंवार येत नानासाहेबांच्या घराण्याला वारकरी संप्रदायाचा अमृतस्पर्श पूर्वीपासूनच लाभला होता. त्यांचे वडील संत तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी आदि ग्रथांचे भक्तीभावाने पठण करीत.श्रद्धापूर्वक पंढरपूर ,देहू ,आळंदी इत्यादी पवित्र क्षेत्रांना भेटी देत.धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी होत" आज माझ्या जीवनात मला कार्यरत ठेवणारा ,अनंत अडचणींवर विजय मिळणारा,मला सतत प्रेरणा व उत्साह देणारा जो ब्रम्हरस आहे ,त्याचा उगम माझ्या वडिलांच्या साध्याभोळ्या पण प्रखर भक्तिभावात आहे." असे ते म्हणत.याही पुढे जाऊन नानासाहेबांच्या शब्दांत ,सांगायचे झाले तर ---1961 सालातील गोष्ट . मला आठवते वयाच्या 80  व्या वर्षी माझे वडील पंढरपूरच्या वारीला निघाले .सोबत आपल्या पासोडीत ज्ञानेश्वरी, खांद्यावर घोंगडी ,अनवाणी ,नेसत्या वस्त्रानिशी,बाकी काहीही एक सोबत न घेता ते अगदी निष्कांचन अवस्थेत परमेश्वरावर श्रद्धा विश्वास टाकून रांजणगाव  ते पंढरपूर अशी पायी वारी करण्यात यशस्वी झाले नमूद करावेसे वाटते की वारीला निघतांना त्यांनी घरून सोबत पैसे व दशम्या ही घेण्याचे नाकारले."परमेश्वर रस्त्याने माझी संपूर्ण व्यवस्था करील असे ते आत्मविश्वासाने म्हणाले .'ही घटना माझ्या जीवनाच्या अखेरपर्यंत सतत प्रेरणादायी ठरणार आहे . त्याचप्रमाणे टाळांचा आवाज माझ्या अंत करणात मांगल्याचे  स्पंदन निर्माण करतो असे नानासाहेब कृतज्ञतेने व्यक्त करतात.


           नानासाहेबांच्या मातोश्री कै. लक्ष्मीबाई स्वभावत: हो अतिशय कष्टाळू, प्रेमळ व सोशिक होत्या.लहानपणी ऐकलेली प्रेमळ मातेच्या जात्याची घरघर आजही नानासाहेबांच्या जीवनात पथदर्शक ठरली आहे .माता पित्याकडून मिळालेला प्रेमाचा व परमेश्वर निष्ठेचा वारसा नानासाहेबांनी जीवापाड जपला आहे किंबहुना तो सहस्त्र पटींनी वाढवून समाजावर त्यांची मुक्त हस्ताने उधळन करीत आहेत असा अनुभव वारंवार येतो.
    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...